फेब्रुवारी 1, 2010 by mipunekar
कोणत्याच टीमने पाकिस्तानी खेळाडूंसाठी बोली लावली नाही आणि त्यामुळे सध्या बराच वादंग उठला आहे. याबाबत ज्या काही लोकांची मी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यापैकी बहुतांशी लोकांनी जे झाला ते अतिशय चांगलं झालं अशी टिप्पणी केली. मला सुध्धा खूप बरे वाटले, मनाला शांती लाभली. काही लोक म्हणत होते हे झालं ते चुकीचे आहे. खेळामध्ये राजकारण आणणे बरोबर नाही. तुम्ही लोक खेळाचा आनंद लुटा, आणि आपापसातील वैर बाजूला ठेवा…. किती सोपा आहे न असा म्हणणं?
IPL वाल्यांनी कोणत्या का कारणांनी पाकिस्तानी खेळाडूंना घेतला नाही तो त्यांचा प्रश्न आहे. शेवटी ते लोक धंदा करायला बसलेत. मी म्हणेन त्या खेळाडूं मार्फत चांगली अद्दल घडली आहे पाकिस्तानला. आपण हर तर्ह्रेने त्यांचा त्रास सहन करायचा आणि आपण आपसी भाईचाऱ्या अंतर्गत त्यांच्या खेळाडूंना, गायकांना डोक्यावर बसवून ठेवायचं. त्या लोकांकडे आपल्या सारखी चित्रसृष्टी नाही म्हणून आपले चित्रपट तिकडे चवीने पहिले जातात. वाघाला वाघ म्हणा अथवा वाघोबा म्हणा त्याला काही फरक पडणारे का?
मी तर तो कोण तो आतिफ अस्लम, अदनान सामी यांसारख्या पाकिस्तानी कलाकारांची साधी गाणी सुध्धा न गुणगुणायचा विचार करतोय…..
36.515506
-87.361221
Posted in उत्स्फुर्त | Tagged IPL, Pakistan | Leave a Comment »
जानेवारी 13, 2010 by mipunekar
अमेरिकेत नुकताच सुपर डुपर शॉपिंगचा हंगाम संपला. २५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या काळात अमेरिकेत ऑनलाइन आणि दुकानात मिळून प्रचंड उलाढाल होते. सर्व गोष्टींवर अक्षरशः भरघोस सूट दिलेली असते. म्हणून बरेच लोक गरज नसताना सुद्धा खरेदी करतात. या मुळेच दुकानदारांचे चांगलेच फावते. सगळी कडे क्लिअरन्स सेल लावतात आणि दुकान आणि ओघाने ग्राहकाचे खिसे रिकामे करून घेतात. सगळी कडे नुसती मजा चालू असते. दुकाने पहाटे २ ला, ४ ला उघडतात आणि ८०% सूट वगैरे देतात मग काय लोक २ / २ दिवस आधी दुकानाबाहेर रंग लावून बसतात. तिथेच तंबू ठोकून राहतात.
असो थोडं विषयांतर झाले.
बाकी देशांमध्ये रिटर्न पॉलीसी कशी असते ते माहित नाही. पण भारतात सोडून सगळी कडे ती चांगली राबवली जात असणार. आता रिटर्न पॉलीसी म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही दुकानातून काहीतरी विकत घेता आणि ते आवडला नाही अथवा खराब झालं तर तुम्ही ते अगदी सहज परत देवू शकता आणि पैसे परत मिळवू शकता. तुम्हाला कोणी विचारात नाही कि तुम्ही का परत करत आहात. ही रिटर्न पॉलीसी अगदी १ डॉलरच्या वस्तू पासून ते अगदी १००० डॉलर च्या LCD TV पर्यंत काहीही परत करू शकता. आता याला सुध्धा लिमिट असते कि ३ महिन्यांच्या आत ती गोष्ट परत केली पाहिजे आणि पावती पाहिजे ईत्यादी ……
हे दुकानदार मग असली रिटर्न आलेली उपकरणे वगैरे परत किंमत कमी करून used म्हणून सेल लावतात.
आता हा झाला या इकॉनॉमीचा भाग की ते लोक, लोकांना कहीही करून विकत घ्यायला भाग पडतात. पण खूप कमी लोक असं उगाचच परत करत असतील. पण या गोष्टीचा अमेरिकेतले बरेचसे भारतीय अथवा देसी लोक गैरफायदा घेताना दिसतात. मी अनेक लोकांना असं करताना पाहिलं आहे. आता ते करतात काय तर समजा एखाद्या दुकानात TV चा सेल चालला असेल तर ते तो TV विकत घेतात २.५ महिने वापरतात आणि नंतर सरळ जाऊन दुकानात परत करतात कि आवडला नाही. माझ्या मित्राचा बॉस असं करतो नेहमी. आता तो बॉस सुद्धा अमेरिकेत चांगला ५ / ६ वर्ष राहिला आहे तरी…
काही जणांचं ऐकला होता कि ट्रीपला तर जायचय पण फोटो काढायला कॅमेरा नाही तर काय दुकानातून कॅमेरा घ्यायचा ट्रीप पुरता वापरायचा आणि आल्यावर परत करायचा. सो सिम्पल…
आता अमेरिकेत येवून असला देसीपणा दाखवायलाच पाहिजे का? आपणच आपल्याला बदनाम करत आहोत असं त्यांना नाही का वाटत? भारतात स्वप्नात तरी होईल का कोणत्या दुकानाची असली रिटर्न पॉलीसी ठेवायची हिम्मत. तसं म्हणाला तर कोपऱ्यावरच्या वाण्याकडे थोडीशी रिटर्न पॉलीसी चालू असते. पण ते तेवढ्या पुरतेच………..
Posted in उत्स्फुर्त | Tagged रिटर्न पॉलीसी, return policy | Leave a Comment »
ऑक्टोबर 20, 2009 by mipunekar
घरापासून दूर दिवाळी साजरी करायची कल्पनाच किती असह्य आहे.घरापासून दूर म्हणजे अगदी एकवेळ आपण भारतात जरी कुठेही असलो तरी दिवाळीची थोडी का होईना मजा आपण लुटू शकतो. कारण थोड्या फार फरकाने सगळीकडे दिवाळी ही साजरी होते. चालीरीतींचा आणि खादाडीचाच काय फरक असेल तो. आपले किती तरी आप्तस्वकीय आपल्यापासून, भारतापासून दूर राहतात ते कशी बरे करत असतील दिवाळी साजरी?
माणसाने कामानिमित्त अगदी चंद्रावर राहावे पण दिवाळीसाठी त्यानी आपल्या घरीच यावे. अशी माझी मनस्तिथी झाली आहे.
दिवाळीसाठी वातावरण निर्मिती:
दिवाळीसाठी वातावरण निर्मिती चालू करण्यात खालील गोष्टींचा समावेश असतो.
- पिठाच्या गिरण्या चकलीच्या भाजणीच्या, ह. डाळीच्या डब्यांनी गच्च भरून जायला सुरवात होते
- रस्त्यातून जाताना चकलीच्या खमंग वासाची झुळूक येते
- बिल्डींग मधून कुठून तरी बेसनाच्या लाडूचा वास हजेरी लावून जातो
- चकली / शेवेचा सोऱ्या / यंत्र शेअरिंग बेसिस वर फिरू लागते
- रस्त्यात, दुकानात रंगीबिरंगी आकाशकंदील दिसू लागतात
- दैनिक सकाळ मध्ये मधूनच फोटो येतो की लक्ष्मी रस्त्यावर दिवाळीची लगबग / लक्ष्मी रस्ता गर्दीने फुलून गेला वगैरे. या सुमारास चितळे बंधू ग्राहकांसाठी सज्ज अशी पण बातमी एकदा वाचली आहे.
दिवाळी म्हणजे थोडक्यात ती संपताक्षणी परत कधी येणार अशी वाट बघत बसतो तो सण. नवीन वर्षाचे कॅलेंडर घरात आले रे आले की पहिल्यांदा काय पाहायचे तर दिवाळी कधी आहे, किती दिवस आहे. ज्या वर्षी अगदी ५ दिवस दिवाळी असेल त्या वर्षी अगदी भारी वाटत की यंदा खूप दिवस अनुभवायला मिळणार दिवाळी. पण एक आहे की दिवाळीचा शेवटच्या दिवसाची संध्याकाळ कधी येउच नये अशी असते. त्या संध्याकाळी फराळाचे रिकामे डबे, संपलेले / फुसके म्हणून उरलेले फटाके, खिडकीतून काढून ठेवलेला आकाशकंदील, शाळा / कॉलेज / ऑफिस चालू व्हायची तारीख असं सगळं नको नको ते चित्र डोळ्यासमोर दिसू लागते आणि उद्या पासून तेच रहाट गाडगे पुन्हा चालू अशी भावना मनात येते.
लहानपणची दिवाळी
लहान असताना सहामाही परीक्षेचा शेवटचा पेपर अगदी टाकणे टाकल्या सारखा लिहिला जायचा. कधी एकदा परीक्षा संपते आणि ती दिवाळीची सुट्टी लागते असं झालेलं असायचं. दिवाळी सुट्टी म्हणजे फुल टू कल्ला करायचा. लवंगीची माळ सुटी करून वाजवायची. नरकचतुर्दशीला सकाळी पहिला फटका कोण लावतो त्याची स्पर्धा लावायची आणि अजून कित्ती तरी गोष्टी…
दिवाळी म्हणजे कल्ला करायचा. नवे कपडे घ्यायचे , किल्ला करायचा. या किल्ला प्रकारामुळे लहान मुलांच्या क्रीएटीव्हीटीला चालना मिळते. ऑफिशियली चिखलात खेळायला मिळतं ती गोष्ट वेगळी. किल्ला करून झाला की त्यावर अळीव पेरायचे. मग ते उगवले की सगळी चित्र मांडायची. गुहेत वाघ, विहिरीपाशी पाणी भरणारी बाई, मावळे, भाजीवाल्या बायका आणि अति महत्वाचे म्हणजे शिवाजी महाराज स्थानापन्न करायचे. एका दिवाळीत तर मी त्या वाघाच्या गुहेत चक्क १ डायनोसोर पहिला होता.
आज त्या सगळ्या साजऱ्या केलेल्या दिवाळ्या डोळ्या समोर येत आहेत. आणि आज असे भारतापासून इतक्या दूर अमेरिकेतल्या एका खेड्यात जिथे मोजून ४ भारतीय टाळकी आहेत अशा वातावरणात दिवाळी सेलीब्रेशन म्हणजे नर्व्हस ब्रेकडाऊन व्हायची वेळ आली होती. पण जशी दिवाळी जाईल असे वाटत होते तशी ती बिलकुल गेली नाही. एक नातेवाईक जवळच राहतात त्यांच्या कडे दिवाळी साठी गेलो होतो. म्हणून दिवाळीची मजा लुटता तरी आली आणि बिन दिवाळीचा जो काही बोजा मनावर होता तो पूर्णपणे निघून गेला.
इतकी वर्षे पुण्यात असताना बरेच भाऊ, मित्र वगैरे असेच शिक्षणासाठी घरापासून दूर गेले होते. तेव्हा वाटायचे की ते लोक त्यांच्या मित्रांसोबत एकत्र जमून वगैरे साजरी करत असतील दिवाळी. त्यामुळे ते लोक दिवाळीला काय करत असतील असा साधा विचार सुध्धा कधी मनात आला नव्हता. आज मला कळले की त्यांनी दिवाळी कशी साजरी केली असेल. कळली म्हणजे कोणाची पाहून कळली नसती स्वतःला अनुभवायला मिळाली म्हणून जाणीव तरी झाली. अन्यथा असे पण काही असते असं कधी कळलेच नसते.
असो जे काही होतं ते चांगल्या साठी होतं असं म्हणायचं आणि पुढे जायचं. पुढच्या वर्षी ही कसर भरून काढीन.
दीपावलीच्या आणि नूतन सवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
Posted in Diwali, आठवणी | Tagged दिवाळी 2009, diwali 2009 | Leave a Comment »
सप्टेंबर 20, 2009 by mipunekar
या नावावरूनच सगळं काय आहे ते कळून येते. हा परिणाम आहे सध्याच्या रिसेशनचा. काल हा IBN च्या साईट वरचा न्यूज वीडीओ पाहिला आणि गम्मत वाटली. अमेरिकेत IBN नुसार रिसेशनमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना घरी मनसोक्त वेळ मिळू लागला आणि मग काय आली बेबी बूम. सगळी नर्सिंग होम्स म्हणे भरली आहेत. माहीत नाही की हे असं खरच घडलंय की टाईम पास न्यूज आहे…
हि असली बेबी बूम वगैरे अमेरिकेत ठीक आहे. यांना लोकसंख्या वाढीचा प्रश्न नाहीये. त्यांना नोकरी गेली तरी काही दिवस सरकारकडून बेरोजगारी भत्ता मिळत राहतो. असाच मनात विचार आला कि आपल्याकडे अशी परिस्थिती आली तर….. आपल्याकडे असं होणार नाही आपले लोक सुज्ञ आहेत, त्यांना परिस्तिथीची जाणीव आहे. त्यामुळे अशी बूम येऊ देणार नाहीत.
Posted in Internet | Tagged US baby boom | Leave a Comment »
ऑगस्ट 24, 2009 by mipunekar
काल असे भयानक स्वप्न पडले की सकाळी उठल्यावर किती वेळ मी त्याच अवस्थे मध्ये होतो. जणू काही रात्री झोपायच्या आधी सगळं तसं घडले होते. बापरे बाप …..
तर एकूण झाले असे होते. माझी कोणती तरी अति महत्वाची परीक्षा होती सी. ए.होती का तत्सम एखादी. इतकी महत्वाची की या जगात त्यापेक्षा दुसरं महत्वाच काहीच नाही. आणि बहुदा त्या परीक्षेचा एकच अटेम्प्ट होता म्हणजे एकदा त्यात नापास झालो की आयुष्यातून उठणार.
मुळात मी शास्त्र शाखेचा विद्यार्थी. त्यामुळे अशा प्रकारच्या परीक्षेला मी १ महिना आधी जागा झाल्यावर माझ्या टरकलेपणाची जाणीव येवू शकेल.
बर ती परीक्षा होती मे महिन्यात. आणि मला अभ्यासाची जागच मुळी आली होती एप्रिल महिन्यात. म्हणजे लिटरली परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यावर मी अभ्यासासाठी जागा झालो होतो. आणि विषय सुध्धा कधीही न ऐकलेले. च्यायला त्याच वेळी मला झोपेतून खडबडून जाग आली. विचार केला काय चाललाय? कसली परीक्षा आहे माझी? काहीच सुचेना म्हणून परत झोपलो. तर हेच परीक्षेचं स्वप्न परत चालू झाले. मी मित्रांकडे चौकशी करत होतो की किती अवघड आहे परीक्षा आणि काय काय…. चांगली अकौंटसची जाडजुड पुस्तक घेवून फिरत होतो कोणत्या तरी कॉलेज मध्ये.
याच सुमारास मला झोपेतून परत जाग आली. वेळ बघितली तर पहाटेचे साडे तीन वाजले होते. जाम फाटली होती माझी. घाम फुटला होता. मी पाणी प्यायलो आणि एकीकडे विचार करत होतो कसा होणार माझं या परीक्षेत? नापास झालो तर आई बाबा काय म्हणतील?…. म्हणजे स्वप्नात जे चाललाय ते खरं आहे हे मी समजून चुकलो होतो. परत झोपल्यावर स्वप्न तिथून परत चालू झालं होतं.
सकाळी घड्याळाचा गजर होऊन उठलो तोच मुळी प्रचंड टेनशन मध्ये. उठल्यावर सुध्धा पुढची ५ ते १० मिनिटे मी त्या परीक्षेच्या दडपण खालीच होतो. आत्ता सुध्धा मला त्या स्वप्नातल्या घटना आणि त्यासाठी मोजलेल्या घटका आठवल्या तरी अंगावर काटा येतो. नको रे बाबा असलं स्वप्नं परत कधी. लोकांच्या स्वप्नात सुंदर तरुणी आणि निसर्गरम्य ठिकाणे येतात आणि मला काळात नाही कसली ही अघोरी स्वप्नं पडतात. पूर्वी सुध्धा अशी अंगावर काटा आणणारी स्वप्न मला पडली आहेत.
जब वी मेट मध्ये त्या करीना कपूर ला गाडी चुकल्याची स्वप्न पडायची. ती तरी बरी म्हणायची. ही गाडी चुकली तर पुढची गाडी मिळेल. ठीके गाडी नाही मिळाली तर विमानांनी जाल. तेही नसेल तर खाजगी गाडी करून जाल पण जाल तरी…
सकाळी जेव्हा भानावर आलो तेव्हा जो सुटकेचा निश्वास टाकलाय म्हणून सांगू की बस. हुह ह ह!!!!!!!!!!!!!!!
Posted in dream, उत्स्फुर्त, स्वप्न | Tagged भितीदायक स्वप्न, horrible dream | १ प्रतिक्रिया »
ऑगस्ट 3, 2009 by mipunekar
चला चला तयारीला लागा. १५ ऑगस्ट अवघ्या २ आठवड्यावर आला आहे. राष्ट्रभक्तीचा फिवर हळू हळू चढू लागला असेल. ओडीओ केसेट आणि सीडीच्या बाजारपेठ राष्ट्रभक्तीपर गाण्यांनी दुमदुमून गेल्या असतील. लहान मोठे, गोड भसाडे असे सर्व प्रकारचे आवाज आधीच सज्ज होऊन गाणी रेकॉर्ड करून पार असतील. स्पीकर भाड्यानी देणारी दुकाने भाव लावत असतील. आता १५ ऑगस्ट म्हणजे सगळी गणेश मंडळे ते स्पीकर भाड्यानी घेवून ती गाणी नाही का लावणार? त्या स्पीकरच्या ज्या भिंती लावतात ना त्याला काय म्हणतात माहित आहे का? त्याला थप्पी म्हणतात. जितके स्पीकर जास्त तितका ते गणेश मंडळ भारी असा दावा त्या मंडळाचे सक्रीय कार्यकर्ते करत असतात. मग लयी भारी बनायला ती चढाओढ ती स्पर्धा सगळं सगळं आलं.
१५ ऑगस्ट च्या मुहूर्तावर गरजू मुलांना वही वाटप, रक्तदान शिबिरे यासारखे कार्यक्रमांचे आराखडे बांधले जात असतील.
कारण तसेही त्यापुढच्या आठवड्यात गणपती बसत आहेत म्हणजे काय कामाला उधाणच येणार. गणेशोत्सवावर नंतर लिहीन कधीतरी.
झेंडा आणि भिरभिरे कारागीर वेताच्या छडीवर ती भिरभिरे लावत असतील. भिरभिरं लावून झाला कि मग ते गरागरा फिरलं पाहिजे तर ते खरं.
नेते मंडळींनी पांढरे शुभ पोशाख कपाटातून काढून ट्राय केले असतील. कारण २६ जानेवारी नंतर आजच तो पांढरा ड्रेस हे जग पहात असेल आणि या ६ / ७ महिन्याच्या कालावधीत त्या महाशयांचे माप त्या ड्रेस मध्ये झाकलं गेलं पाहिजे ना…..
त्या नेते मंडळींचे PA कुठून कुठून नवनवी भाषणे लिहून आणायच्या गडबडीत असतील. राजकीय पार्टीचा प्रचार आणि १५ ऑगस्ट असे २ पक्षी त्या भाषणांनी मारायचे असतात.
सर्वात महत्वाचे म्हणजे आपला तिरंगा…… तिरंगा फडकवायचा म्हणजे त्याची विशिष्ट प्रकारची घडी घातली पाहिजे. वर्षभर निट पावित्र्य पूर्वक ठेवला पाहिजे. बुधवार पेठेत लहान मोठ्या आकाराचे झेंडे विक्री साठी उपलब्ध असतील.
सर्व शाळांची NCC आणि Scout ची मंडळी त्यांच्या तयारीत असतील.
हे सर्व चालू असताना नोकरदार मंडळीची वेगळीच तयारी चालू असेल. ट्रीप ला जायची. कारण १५ ऑगस्ट म्हणजे हक्काची सुट्टी. आणि शनिवार रविवार ला जोडून आलेला १५ ऑगस्ट म्हणजे काय सांगू? या वर्षी नेमकी हक्काची १ दिवस सुट्टी गेली असा सार्वत्रिक सूर असणार.
तरी जाणारे शुक्रवारची सुट्टी टाकून जायचा प्लान करत असणार…. आणि जे कौटुंबिक लोक कुठे जाणार नाहीत ते १५ ऑगस्टला सकाळी कुठल्याश्या बेकरीबाहेर पेटिस किव्वा इडली चटणी साठी रांगेत उभे असतात.
अरे पण काहीतरी कमी आहे. हे सगळं करत असताना देशभक्ती कुठे आलीच नाही. हे सगळं केलं की आपण देशभक्त होतो का? काय केलं की माझी देशभक्ती दिसेल?
ज्याचं देशावर खरं प्रेम आहे त्याला त्याची देशभक्ती दाखवायची गरज नसते. त्याची प्रत्येक कृती हि राष्ट्रासाठी असते. आपण आपलं जे काही काम असो, मग ते कोणतेही असो ते जर आपल्या दृष्टीने ११०% देवून केले तर एका अर्थानी आपण राष्ट्राच्या उन्नतीला हातभारच लावू.
ए मेरे वतन के लोगो
जरा आंख मे भरलो पाणी
जो शहीद हुवे हीन उनकी
जरा याद करो कुर्बानी
जय हिंद
वंदे मातरम्!
Posted in 15 August, उत्स्फुर्त, वंदे मातरम्, १५ ऑगस्ट | Tagged 15 August, उत्स्फुर्त, वंदे मातरम्, १५ ऑगस्ट | Leave a Comment »
जुलै 26, 2009 by mipunekar
सोनल एक मध्यम वर्गीय तरुणी. अत्यंत आकर्षक असे व्यक्तिमत्व. कमनीय बांधा, पाठीवर घोळणारे काळसर तपकिरी केस, सुरेख डोळे, धारदार नाक आणि हसली कि समोरचा घायाळ…. उंचीला साधारण ५ फुट ३ इंच पण कीर्तीला एकदम महान. सोनल १० वी आणि १२ वी दोन्ही वेळा बोर्डात आलेली होती. इंजिनीरिंग पण अव्वल श्रेणीत पास केले होते. आणि इतका सगळा असून सुध्धा माज काय असतो ते तिला ठावूक नाही. कोणीही ओळखीचा भेटला की त्याच्याशी ४ शब्द हसून बोलणार की समोरचा माणूस तिथेच आउट. पण सोनलला आधीपासूनच कोणीतरी आउट करून टाकले होते. राकेश! हो तिचा १२ वी पासूनचा जिवलग मित्र आणि तिचा बॉयफ्रेंड पण. राकेश सुध्धा सोनलसाठी अनुरूप असाच होता. ६ फुट किव्वा थोडासा जास्तच उंच, एकदम राजबिंडा. दोघांची जोडी म्हणजे मेड फॉर इच आदर. म्हणूनच कि काय सोनल ला फारशा मैत्रिणी पण नव्हत्या. जिवलग साथी जो होता.
दोघांना इंजिनीरिंग नंतर योगायोगानी एकाच मल्टी नेशनल कंपनी मध्ये नोकरी मिळाली होती. आणि दोघांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
सोनल आणि राकेश यांचा मागच्याच वर्षी प्रेम विवाह झाला. पण त्यांना कंपनीच्या नियमानुसार लग्न झाल्यावर वेग वेगळ्या प्रोजेक्ट वर हलवण्यात आला. दोघेही एकदम खट्टू झाले होते. पण कंपनी पोलीसी पुढे काय करणार ना.
मे महिना संपत आला होता. सोनल च्या प्रोजेक्टची डेडलाईन समोर उभी होती. ऐन मे महिना म्हणजे लग्न सराईचे दिवस. त्यामुळे तिच्या प्रोजेक्ट मधले २ जण ऐन प्रोजेक्ट डिलिव्हरी च्या वेळी गायब होते. त्यामुळे जे लोक होते त्यांच्या वर सगळा बोजा आला होता. सोनल प्रोजेक्ट लीड करत होती आणि तिच्या हाताखाली ५ डेव्हलपर होते. कालच प्रोजेक्ट स्टेटस मिटिंग मध्ये टेस्टिंग टीम नि काही जुने पण क्रिटीकल बग्स अजूनही तसेच असल्यामुळे तीव्र नाराजी दर्शवली होती आणि हि गोष्ट वर पर्यंत गेली होती. त्यामुळे अकौंट मेनेजर आणि वरची बरीच मंडळी चिंताक्रांत होती. एक दोन बग्स तर जीवघेणे होते. ते प्रोजेक्ट होतं अमेरिकेच्या एका बँकेच. त्या बगमध्ये प्रत्येक वेळी १ सेंट [ जवळ जवळ ५० पैसे ] बँकेच्या ग्राहकांना बँकेकडून जास्त जात होते. त्यामुळे बँक म्हणाली एकवेळ प्रोजेक्ट पूर्ण करू नका पण हे असे फुकटचे पैसे वाटणे बंद करा. सोनल आणि तिची टीम डोळ्यात तेल घालून प्रोब्लेम सोडवायचा प्रयत्न करत होते. पण तो बग काही केल्या राम म्हणायला तयार नव्हता. सोनलनी सगळ्या डेवलपर्सची एक अर्जंट मीटिंग बोलावली आणि म्हणाली ” guys आता पाणी गळ्यापर्यंत आले आहे. हे प्रोजेक्ट तडीपार नेणे अत्यंत गरजेचे आहे. मला माहित आहे तुम्ही आज पर्यंत या प्रोजेक्ट वर किती कष्ट घेतले आहेत. अजून चारच दिवस मला हे जास्तीचे कष्ट तुमच्या कडून अजून हवे आहेत. मला तो दिवस दिसतोय कि जेव्हा आपल्या प्रेत्येकाला आपल्या कस्टमर कडून आणि ऑफिस मधल्या मेनेजर्स कडून अभिनंदनाच्या इमेल्स येत आहेत. आपण नुसते हे क्रिटिकल बग्स सोडवणार नाही आहोत तर संपूर्ण प्रोजेक्ट यशस्वी रित्या पूर्ण करणार आहोत. तुमच्यात तेव्हढी क्षमता आहे हे मला माहित आहे.” मिटिंग मध्ये प्रत्येक जण सोनल काय बोलत्ये हे कान टवकारून ऐकत होते. त्यांना सुध्धा सोनल वर पूर्ण विश्वास होता. त्यांना सुध्धा पटले कि Yes We can do it and we will do it.
सोनल पुढे म्हणाली “चला तर मग कसे जात नाहीत ते बग्स बघतेच मी”. असं म्हणून तिने त्या महत्वाच्या १ सेंट बग सोडवायचा काम आपल्या हाती घेतलं आणि बाकी छोटी कामे पण पटापट वाटून टाकली. आता प्रत्येक जण युद्ध पातळीवर काम करू लागला.
गेले २ आठवडे सोनल घरी फक्त ५ तासान साथी जात होती. रात्री उशिरा राकेश तिला ऑफिसमध्ये घ्यायला यायचा. त्याला सुध्धा पूर्ण कल्पना होती कि तिची सध्या अवस्था काय आहे. सोनालच काय तिची सगळी टीमच घरी नावा पुरती जात होती. सर्वांच्या ध्यानी मनी एकाच ध्यास होता प्रोजेक्ट completion.
काल रात्री साधारण ८ वाजले असावेत. सगळे जण नुकतेच चहा बिडी मारून आले होते. सोनलने सुद्धा २ दाबेली पार्सल मागवल्या होत्या. सोनल तिच्या डेस्क वर तो १ सेंट बग घेवून बसली होती. विचार करत होती इथे कॉम्पुटर कोड तर सगळा बरोबर आहे मग घोडं अडतंय कुठे? काही केल्या तिला समजेना की नक्की होतंय काय. तिथल्या तिथे पहिला तर १ सेंटचा घोळ होत नव्हता. पण कस्टमर कडे का प्रोब्लेम येतोय?
कॉम्पुटर कडे ती अशी १ टक बघत बसली होती. आणि अननोइंगली उजव्या तर्जनीनी केसाच्या बटीशी खेळत होती. एकदम तंद्री लागली होती. मनोमन ती त्या बग ला विचारात होती कोण आहेस रे बाबा तू? कुठे लपला आहेस? तुझा नक्की प्रोब्लेम काय आहे? का आला आहेस? अजून कोण कोण आहेत तुझ्या बरोबर?
ती असा विचार करताच होती आणि तितक्यात काय झाला तिला पण कळले नाही.
असा एकदम एक मोठ्ठा प्रकाशाचा झोत तिला दिसला आणि कोणीतरी तिला ओढत असल्याचा भास तिला झाला. ओढत ओढत तिला एखाद्या टनेल मधून गेल्या सारखा वाटलं. तिला कळेना की आपण नक्की आहोत कुठे? सगळा नव नव होतं तिथे. असं कधीच पहिला नव्हतं कुठे. मोठमोठ्या वायर होत्या, PCB चे बोर्डे होते. आणि तितक्यात तिला १ ओळखीचा भाग दिसला. तिला समजेना हे कुठे पाहिलंय. आणि जे तिला आठवल ते बघून ती खाली चक्कर येवून पडली.
तिचा मोबाईल वाजला म्हणून ती भानावर आली. राकेशचा फोन होता. तो विचारात होता कि आज किती वाजता घ्यायला येऊ तुला? पण सोनल काही बोलायच्या मनस्तिथित नव्हती. ती म्हणाली “राकेश तुला मी १० मिनिटां मध्ये परत फोन करते.”
तिनी आजूबाजूला पाहिल्यावर तिला असं समजले कि ती तिच्या कॉम्पुटरच्या मोनिटरच्या आत आली आहे. तिला अक्षरशः फिल्मी स्टाईल मध्ये मैं कहा हुं! मैं इधर कैसे आई? वगैरे झाले. तिनी स्वतःला चिमटा घेवून खात्री केली कि स्वप्नात तर नाहीये ना पण छे कसला काय खरा खुरा होता सगळं. रडू म्हणजे अगदी फुटायचे बाकी होते. तिला हजारो प्रश्न पडू लागले कि आता पुढे काय? बाहेर कशी जाणार? प्रोजेक्टचे कसे होणार? तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. कोणीतरी sms पाठवला होता. काहीच समजेना की नक्की होतंय काय? तिनी राकेशला फोन लावला. आणि म्हणाली “हां राकेश काय करतोयस? बरं ऐक काय सांगत्ये ते.” तिला थांबवत तो म्हणाला “काही नाही कॉम्पुटर वर गेम खेळतोय. का गं काय झालं?” सोनल म्हणाली ” एक काम कर. असशील तसा लगेच ऑफिस मध्ये ये. मला थोडी मदत हवी आहे आणि तुझ्या शिवाय दुसरं कोणी करू शकणार नाही. लगेच ये. आणि मला कॉल कर आलास की .” राकेशला पण काही समजेना. पण एकदम रंगात आलेला गेम सोडून जाणे म्हणजे…. पण तो बोलला “ठीक आहे मी निघतो लगेच. सगळं व्यवस्थित आहे ना?” सोनल म्हणाली “हो रे. तू ये तर खरं.”
सोनलला कळत नव्हता कि जे घडतंय ते राकेश ला कसं सांगायचं? एकदम अघटीत जे होता.
सोनल पाहत होती ते तिच्याच अप्लिकेशनचा १ भाग होता. तेव्हढ्यात तिला कोणीतरी मागून हाक मारली.
“हाय सोनल !!!!!” तिनी पटकन मागे वळून पहिला तर असं १ लाल बॉल सारखं काहीतरी हवेत तरंगत होतं. तिनी घाबरून विचारला “कोण आहेस तू?” जाम फाटली होती सोनलची. दरदरून घाम फुटला होता. एका हातात मोबाईल घट्ट पकडून दुसऱ्या हातानी ती ओढणीच्या टोकाला घाम पुसत होती. पोटात भीतीनी गोळे तयार झाले होते. छातीत धडधडत होतं. हात पाय थंडगार पडले होते.
परत एक दीर्घ श्वास घेवून, आवंढा गिळत तिने विचारलं ” ए कोण कोण आहेस तू?”
तो लाल बॉल बोलला “मी तुझ्या अप्लिकेशन मधला एक बग आहे.”
सोनल म्हणाली “काय? कोण आहेस तू? बग?”
ती मनात म्हणाली असं कसं होऊ शकेल? बग वगैरे असं बोलतात का कधी? पण जे घडतंय त्याकडे पाहून काहीही घडू शकतं हे तिला पटले. अगदी क्षणभर तिला नुकत्याच पाहिलेल्या Harry Potter सिनेमामधलं पण खरं तसं होत असेल असं वाटून गेलं.
ती त्या बॉल रुपी बग ला म्हणाली मी इथे कशी आले? कोणी आणला मला इथे?
तो बग अगदी शांतपणे म्हणाला “सोनल घाबरू नकोस. तुला आमच्यापासून कोणताही धोका नाहीये. आम्ही तुला मदत करण्यासाठीच इथे असं अचानक आणलं आहे. आम्ही तुला तुझ्या अप्लिकेशन मधले बग्स म्हणजे माझे भाऊबंद याचा नायनाट करण्यासाठी घेवून आलो आहोत .”
सोनलच्या मनात विचार चक्र परत फिरू लागली. तिला वाटलं यांच्यात काही भांडणं तर झाली नाहीत ना? कि शत्रू चा शत्रू तोच माझा मित्र, कोणत्या तरी बगचा काटा काढायचा वगैरे असेल. आता काय बोलावं मी याला.
ती गप्प बसलेली पाहून तो पुन्हा बोलला “यात माझा किव्वा आमचा कोणताही वाईट उद्देश नाहीये. आत्ता असलेले क्रिटीकल बग्स हे असे सहजासहजी जाणार नव्हते म्हणून हा सारा खटाटोप.”
ती म्हणाली ” आर यु किडिंग?”
बग बोलला “मी ओळख करून देतो. मी C2. मी अश्या अश्या मोड्युल मधला बग आहे. सर्वात क्रिटीकल बग तो १ सेंटचा फरक पडणारा तिकडे आहे. त्याचा नाव C1.”
सोनल म्हणाली “माय गुडनेस, शिट. कुठाय तो C1?”
बग बोलला “चल आपण जाऊ तिथे” आणि ती त्या तरंगणाऱ्या बग च्या मागोमाग चालू लागली. आजूबाजूला तिला असं सगळं स्वप्नवत दिसत होतं. तिने तिची जीमेलची मेलबॉक्स हात लावून पहिली. गच्च भरली होती.
तिकडे जाऊन पाहते तर काय या बग सारखे अजून कितीतरी बग्स तिथे हजर होते.
ती त्या C2 ला घाबरत घाबरत म्हणाली, “हे बग्स कोण आहेत? माझ्याच अप्लिकेशन मधले आहेत कि काय? देवा !!!!”
तो म्हणाला “हो पण घाबरू नकोस हे सर्व एकमेकांवर अवलंबून आहेत. एक बग निघाला कि अजून २/४ सहज निघून जातील.”
तेव्हढ्यात राकेश तिच्या डेस्क पाशी पोचला आणि तिने इतक्या घाईघाईनी बोलावून ती स्वतः मात्र गायब होती. म्हणून त्याने तिला फोन लावला.
सोनल चा फोन वाजला. पाहते तर राकेश कॉलिंग …..
तिनी लगेच फोन रिसीव्ह केला आणि म्हणाली “काय रे किती वेळ लावलास पोचायला? कधी पासून वाट बघत्ये.”
तो म्हणाला मी गेली १० मिनिटे तुला तुझ्या डेस्क च्या आसपास शोधतोय. कुठे आहेस कुठे तू?
मग तिने त्याला सगळं सांगायला सुरवात केली. तो म्हणाला काय? सोनल दारू तर नाही प्यायालीस तू? वेडी झाली आहेस कि काय? मी खेळत असलेला गेम अर्धवट सोडून हि असली मजा ऐकायला नाही आलो. जिथे असशील तिथून लौकर ये मी तुझ्या डेस्क पाशी तुझी वाट बघतोय. ये लौकर. असं म्हणून त्यांनी फोन ठेवला.
सोनल नि परत त्याला फोन लावला. आणि म्हणाली अरे मी खरं बोलत आहे. असं म्हणून बोलता बोलता ती त्या मोनिटर च्या स्क्रीन पाशी गेली आणि म्हणाली कि मला तू स्पष्ट दिसत आहेस. जीन्स आणि ब्लू टी-शर्ट मध्ये आला आहेस आणि आत्ता त्या टेबलवर बसून खुर्ची पायांनी हलवताना दिसतोयस. हो की नाही सांग?
तो बोलला खरं सांग सोनल कुठे आहेस तू? टेबल खाली वगैरे तर नाही लपलीस ना? आता मजा बास झाली बरका.
सोनल म्हणाली अरे मी खरच मजा नाही करत आहे. मला तू दिसतोयस पण तुला मी नाही दिसणार. असं म्हणून त्याला तिने तिच्या डेस्क जवळ बोलावलं आणि म्हणाली खुर्चीत बस आणि मी सांगते सगळं नीट लक्ष्यपूर्वक ऐक.
असं म्हणून ती त्याला सगळा इत्यंभूत वृतांत सांगू लागली. त्याला ते सगळं परीकथे सारखं वाटत होत पण विश्वास ठेवण्यावाचून काही पर्याय नव्हता. ती म्हणाली परत फोन करते १० मिनिटांमध्ये आणि फोन संपवला.
आता ती परत त्या C2 शी बोलू लागली “C2 मला सांग हा १ सेंटच्या प्रोब्लेम ची काय भानगड आहे. कसा सोडवायचा तो प्रोब्लेम? सुटण्यातला आहे का? नसेल तर काही तात्पुरता उपाय आहे का? कोणाच्या चुकीने तो प्रोब्लेम आला आहे?”
C2 म्हणाला “थांब थांब थोडा दम धर. हा C1 प्रोब्लेम पूर्ण जाऊ शकतो . मी तुला सांगतो तो कसा आला. “
मग तो सांगू लागला की मागच्या डीलीव्हारीच्या वेळी १ अर्जंट फीक्स करायच्या वेळी संकेतच्या हातून चुकून का प्रोब्लेम घडून आला. पण जसजसं प्रोजेक्ट वाढत गेलं तशी त्याची व्याप्ती वाढत गेली. त्यावेळी याकडे कोणाचे लक्ष्य गेले नव्हते. पण मी जसं सांगतो तसं जर तू केलास तर तो जाईल.” असं म्हणून त्यांनी तिला तो प्रोब्लेम चे मूळ कुठे आहे ते सांगितले .
तिने लगेच राकेश ला फोन लावून कोणती तरी फाईल ओपेन करून सांगितला कि ह्या ह्या ठिकाणी हे हे असं चेंज कर. राकेश ला काहीही कळत नव्हत.पण तो ती सांगेल तसं करत गेला. तेवढ्यात तिथे तो संकेत येवून पोचला. राकेश नि त्याच्या मदतीनी अजून थोडे बदल केले. संकेत नि विचारला “राकेश सोनल कुठून बोलत्ये फोन वर? इथे येणारे का आज? मला १ प्रोब्लेम आला आहे. १ नवा बग आला आहे असं आत्ता टेस्टिंग टीम कडून मेल आलंय” हे ऐकून तो खुश झाला आणि सोनल ला म्हणाला कि अजून १ बग आलाय असं संकेत म्हणतोय. संकेत म्हणाला “बग आलाय तर हा का खुश का झालाय? च्यायला.याच्या”
तिकडे सोनल त्याला म्हणाली “या संकेतच्याना नानाची टांग. आले की बघतेच त्याच्याकडे. ” असं म्हणत म्हणत तिने तो नुकताच आलेला बग पण चुटकी सरशी सोडवला. आता जर बगच सांगत असेल कि तो कसा जाईल तर किती पण बग्स असोत ना..
फोन वर बोलता बोलता सहज तिच लक्ष्य त्या दूर बसलेल्या C1 बग कडे गेलं. पाहते तर काय? त्या C1 बग चा रंग लाल चा पालटून हिरवा झाला होता. ती C2 ला म्हणाली ” त्या C1 चा रंग असा लाल चा हिरवा का झालाय?”
C2 म्हणाला “अगं तो बग आता सुटलाय. देअर ईज नो मोर C1 बग ईन युअर अप्लिकेशन.”
सोनल म्हणाली “काय सांगतोस काय?” सोनलला इतका हलकं फुलकं वाटत होतं. पण मध्येच शंकेची पाल पण चुकचुकत होती. खरच गेला असेल ना? म्हणून तिनी फोन करून राकेश बरोबर संकेत ला सांगून चेक करायला सांगितला तर आश्चर्य तो बग नामशेष झाला होता.
सोनलला आता लाल बॉल्स पैकी बरेच बॉल्स हिरवे झालेले दिसत होते. इतकाच नाही ज्या C2 शी बोलत होती तो पण हिरवा झाला होता. आणि जवळ जवळ सगळे बग्स संपले होते. तिनी एक सुटकेचा निश्वास घेतला आणि गेल्या २ तासांचा मागोवा घेवू लागली. C2 अजून तिच्या शेजारीच होता. तिची आता परत जायची वेळ आली होती. तिनी त्या सगळ्या बग्स ला आणि स्पेशली C1 आणि C2 म्हणाली “आज संध्याकाळ पर्यंत मी तुम्हाला शत्रू समजत होते पण तुम्ही सगळे तर मित्र निघालात. मी तुम्हा सर्वांची अत्यंत आभारी आहे. आज केवळ तुमच्या मदतीमुळे मी हे सर्व दिव्य पार पडू शकले. मी आयुष्यभर तुमची ऋणी राहणार आहे. पण मला आल्यापासून एक प्रश्न सतावतो आहे. आणि तो म्हणजे कि तुम्ही मला मदत करायची का ठरवलंत? तस म्हणाल तर तुमचा आणि माझा काय संबंध?”
यावर C2 म्हणाला “खरं तर तुझ्या प्रोजेक्ट मध्ये कुठलाही बग कधीच नसतो. पण कधीतरी कोणाच्यातरी चुकीमुळे असं होऊ शकतं पण तुझी कर्तव्य तत्परता, कामावरील निष्ठा बघून आम्ही तुला मदत करायचा निर्णय घेतला. आता या पुढील कोणत्याही प्रोजेक्ट मध्ये कधीही कोणताही बग मग तो कितीही क्रिटीकल असो आम्ही तुला तो सोडवायला मदत करू.”
सोनलला काय बोलावे समजेना. तिने मोबाईल मध्ये पहिले तर साडे अकरा वाजून गेले होते. तिला इकडे येवून बराच वेळ झाला होता. तिने त्यांना परत विचारले “पण आता मी बाहेर कशी जाऊ? आणि तुम्ही सगळे आता कुठे जाणार?”
C2 बोलला “बाहेर जायची काळजी तू करू नकोस एका सेकंदात तू बाहेर पोचशील. आणि आमचा काय आहे गं आत्ता होतो आत्ता नाही. कधी या अप्लिकेशन मध्ये तर कधी त्या. आमचा असं एक ठिकाण नसतो. ना आमच स्वरूप, ना काहीच स्थायी नसतं”
सोनलला कळेना त्यांना कसे म्हणावे कि परत भेटू? तिने परत त्यांचे आभार मानले आणि म्हणाली “मला तुम्हा हिरव्या बग्स ला परत भेटायला नक्कीच आवडेल. आणि खरच तुम्ही मला आयुष्यभर बग्स सोडवायला मदत करणार आहात?” तिचा खरच विश्वास बसत नव्हता.
सोनल नि फोन करून राकेश ला सांगितला कि ती निघाली आहे. आणि तिने सर्वांचा निरोप घेतला आणि टेक ऑफ साठी तयार झाली. निघताना तिची C2 शी नजरानजर झाली. सोनलच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होता. तिने C2 ला हात वेव्ह करून बाय केलं.
परत तिला तो दिव्य प्रकाशाचा झोत दिसला आणि एखाद्या टनेल मधून जातोय असं जाणवले . दुसऱ्या सेकंदाला ती तिच्या डेस्क पाशी होती. ती अशी अचानक आलेली पाहून राकेश पण घोटाळला. पण मग त्याची खात्री पटली. बर झाला राकेश नि संकेत ला २ मिनिटां पूर्वी तिथून पिटाळला होता. नाहीतर ते गुपित नसतं राहिल. तिने राकेश सांगितला कि सगळे बग्स सुटले आहेत आणि आता ते प्रोजेक्ट यशस्वी रित्या पूर्ण होणार आहे. दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता. ती मनोमन त्या बग्स ला धन्यवाद देत होती आणि राकेश ला म्हणाली “बघ माझे बग मित्र” राकेश गोड हसला आणि दोघेही घरी जाण्यासाठी निघाले.
यथावकाश ते प्रोजेक्ट पूर्ण झालं. सगळी कडे सोनलचे गुण गायले जात होते. पण सोनल? सोनल त्या बग मित्र मंडळींचे गुणगान गात होती.
Posted in उत्स्फुर्त | Tagged बग, बग्स, bug, software bugs | Leave a Comment »
जून 24, 2009 by mipunekar
या सायबर क्राइमच्या युगात इंटरनेट वर लपून राहणे हे केवळ अशक्य बनले आहे. या संदर्भातली महेंद्र काकांची खालील पोस्ट वाचून जे काय काय आठवले ते म्हणला टाकावं ब्लॉग वर.
तुम्ही स्वतःला इंटरनेट वर अदृष्य समजतां?
या वरून पुण्यात घडलेली १ घटना आठवली.
एक मुलगा ओर्कुट वर खोटे प्रोफाईल करून एका मुलीला त्रास देत होता.तिनी आधी या गोष्टीकडे कानाडोळा केला पण जेव्हा गोष्ट हाताबाहेर जाऊ लागली तेव्हा मात्र तिनी पोलिसांमध्ये आणि सायबर सेल कडे तक्रार नोंदवली. त्यला पकडायला थोडा वेळ लागला पण तो पकडला गेला.
आपण इंटरनेट वर जे काही करत असतो त्याची नोंद आपल्या ISP [Internet Service Provider] कडे होत असते. म्हणजे कोणकोणत्या sites पहिल्या, कुठे कुठे click केलं इत्यादी इत्यादी…… लोकांना वाटता कि browser ची History रिकामी केली कि झाला. पण नाही
हे म्हणजे मांजराने डोळे मिटून दुध पिण्या सारखे झाले.
आपण जेव्हा कोणाला इमेल पाठवतो तेव्हा त्या इमेल सोबत आपण आपली बित्तम बातमी पण पाठवत असतो.हि सगळी माहिती इमेल हेडर मधून जात असते. हि माहिती म्हणजे तुमचा ISP कोण आहे, कोणता टाइम झोन, देश, IP address [ IP address म्हणजे आपण इंटरनेट वर log in झालो की आपल्या कॉम्पुटर ला एक unique नंबर मिळतो ] इत्यादी
या चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण हे yahoo mail मध्ये पाहू शकतो.

तसेच Microsoft Outlook Express मध्ये सुद्धा हि सोय आहे. Outlook मध्ये मेल उघडल्यावर view -> Options असे क्लिक करून पडताळणी करू शकतो. यासारखी सोय बाकी mail providers मध्ये असेल तर मला कल्पना नाही. आपणास माहित असल्यास जरूर कळवावे.
अमेरिकेत ह्या सायबर क्राईम चा विषाणू खूप पसरलेला.आहे. इथे घडणारा १ common प्रकार म्हणजे Identity theft. या मध्ये इथले सायबर भुरटे, भुरटे कसले दरोडेखोरच इंटरनेट वरून एखाद्याची सर्व गुप्त माहिती जमा करतात आणि त्याची बँक खाती, क्रेडीट कार्ड सगळं इंटरनेट वरून बळकावतात. नेहमी ऑनलाईन शॉपिंग करताना खबरदारी घ्यावी लागते. आणि इकडे सर्व व्यवहार तर ऑनलाईनच होत असतात. म्हणून डील करताना त्या पोर्टल बद्दल गुगलिंग करून थोडी माहिती मिळवावी आणि मगच खरेदी करावी.
भारतात तरी अजून हे पोचला नाहीये. यायला वेळ लागणार नाही. कायम काळजी घेतलेली बरी. कायम बँकेची कागदपत्रे, मोबैईल ची बिले, इतर कागद अगदी चिटोरे चिटोरे करून फेकायचे. कोणाला ते कागद वाचून आपल्याबद्दल माहिती मिळायला नको. असे टपलेले कमी नसतात.
पण आपल्या इथे ऑनलाईन शॉपिंग अजून तरी इतके प्रसिद्ध नाहीये. कारण आपण खरच खात्री देवू शकत नाही कि घेतलेली वस्तू चांगली असेल ना, खराब असेल तर परत कशी करणार आणि मुख्य म्हणजे खरेदीची मजा येत नाही, ४ दुकाने फिरून पायपीट केल्याशिवाय खरेदी झाली असा वाटत नाही.
असो मध्यंतरीच वाचनात आले कि महाराष्ट्र पोलीस सायबर सेल कडे जास्त लक्ष्य देत आहेत आणि त्यांचे हात अधिक मजबूत करणार आहेत. वेळे आधी जागे झाले म्हणायचे.
Posted in Internet, cyber crime | Tagged cyber crime | 3 Comments »
जून 22, 2009 by mipunekar
स्टेफी माझ्या सोबत ऑफिस मध्ये काम करते. सगळ्यांच्यात ती खूप सही आणि मनमिळावू म्हणून प्रसिद्ध आहे. तर त्याचे झाले असे काल तिचा वाढदिवस होता, त्यामुळे स्वारी मस्त नटून थाटून आली होती. अधिक म्हणायचं तर एकदम कडक मध्ये आली होती. येताना तिनी आमच्या सर्वांसाठी खूप प्रकारचे केक आणले होते. सोबत चोक्लेट्स पण होती. शिवाय डोनट पण होते रंगीबिरंगी icing मध्ये लपलेले. मग सर्वांना तिनी बोलावून आस्वाद घेण्यास सांगितले. आता मी जर पुण्यातल्या ऑफिस मध्ये असतो तर हा सगळा माल मसाला काही मिली सेकंद मध्ये गट्टम झाला असता पण इथे सगळे हळू हळू, sofasticated अवतारात तिला शुभेच्छा देवून खाऊ खात होते. बर ही खाद्य यात्रा बास झाली. महत्वाचे तर पुढे आहे.
तर सगळे तिच्या डेस्क भोवती होते एवढ्यात २ सहकारी १ भलामोठा पुष्पगुच्छ घेवून आले. तिनी तो स्वीकारला आणि त्यावरीन संदेश वाचला तर त्यात लिहिला होता from Love. सर्वांना वाटले असेल नवर्यानी पाठवलेला. १० मिनिटे होतात तोवर ६ फुट उंच ग्रीटिंग कार्ड आले. परत ते from Love. ती लाजून लालेलाल झाली होती. अजून ५ मिनिटांमध्ये १ मोठठा चोक्लेट्स चा box आला तो पण Love कडून. जरी अति होत होते. आणि तितक्यात साक्षात तो तिचा Love का कोण आला. मग दोघांचे हस्तालोन्दन झाले. अमेरिकी तर्हेने ग्रीटिंग झाले. म्हणालं चला आता कामाला लागुया. इतक्यात एक मित्र बोलला अरे हा तर तिचा नवरा नाहीये. मी म्हणालो काय? म्हणालो गप तुला काय माहित? तर तो बोलला कि तो मागच्या वर्षी तिच्या घरी पार्टी ला गेला होता तेव्हा भेट झाली होती.
मग आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला. म्हणल असेल बाबा काहीतर गम्मत दोघांची.आपल्याला काय करायचय असेनात का. पण मला राहून राहून वाटत होते या वयात? म्हणजे आज स्टेफी चा ५२ वा वाढदिवस होता. आणि हा जो कोणी Love होता तो तिचा बॉयफ्रेंड होता. म्हणलं अरेय वाह मज्जा आहे.
आपल्याला पुण्या मुंबईत काय भारतात पण असा पहायची सवय नाही म्हणून मला जरा अप्रूप वाटलं बाकी काही नाही.
Posted in office, ऑफिस | Tagged ऑफिस, office | १ प्रतिक्रिया »
जून 16, 2009 by mipunekar
सगळ्या शाळांचा पहिला दिवस पार पडला असेल. मला पण माझे शालेय जीवनातील पहिले दिवस आठवले.
मला अगदी नको वाटायचा तो पहिला दिवस. तोच दिवस असं नाही साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून शाळेचे वेध लागायचे. अगदी नको नको व्हायचे.मग भाऊ चिडवायचा “आता शाळा” हे एव्हढं बोलून सुध्धा पोटात धस्स व्हायचे.
का कुणास ठावूक उगाचच भीती वाटायची. कोण असतील नवे शिक्षक? मित्र काय तेच असणार होते ते तरी बरे होते. मग नवीन विषय, नवा अभ्यास असा ब्रह्मराक्षस दिसायचा समोर. मला अभ्यास बिलकुल आवडायचा नाही. मी प्राथमिक शाळेत असताना कोणीतरी सांगितला होतं कि जसा जसा मोठा होशील तसतसा अभ्यास कमी होत जाईल. हे ऐकून मुख्यतः मी शाळेत जायला तयार झालो होतो. पण कसलं काय?
कित्ती वर्ष बाबच पुस्तकांना कव्हर घालून द्यायचे.नव्या वहीत कायम उजवीकडच्या पानावर लिहायला आवडायचे. कारण उजवीकडचा पान उलटलं कि त्या डावीकडच्या पानाखाली तो पुठ्ठा येतो ना, मग अक्षर नीट येत नाही. वहीच्या शेवटच्या पानावर कायम अश्या गिरगोट्या मारलेल्या असायचा. मग ते पान भरला कि असा उलटे येत येत ५/६ पाने गिरगोट्याच असायच्या.
लहान शाळेत रोज १ पेन्सील लागायची. लिहून नाही काही संपायची,तर टोक करून संपायची.कायम टोकदार पेनसिलिनी लिहायचं असायचं ना. काय ओरडायची आई यावरून. नंतर त्या शिसे टाकायच्या पेन्सील बाजारात आल्या होत्या. त्या तर अगणिक हरवल्या असतील. आमच्या वर्गात १ मुलगा चांगल्या घरातला होतं तरी पेन्सील,कंपास चोरायचा. एकदा त्याला पाळत ठेवून पकडला होतं नि इतका मारलं होतं कि दुसर्या दिवशी आईला शाळेतच बोलावलं होतं. चौथीतल्या मुलां कडून त्यांनी हे अपेक्षित केले नसेल. पण मज्जा आली होती त्याला मारायला. ४/५ मुलं त्याला व्हिलन समजून मारत होतो.
अशा छोट्या आठवणींवर किती तरी लिहिण्यासारखे आहे. बघू परत कधीतरी वाढवीन पोस्ट.
Posted in आठवणी, शाळा | Tagged आठवणी | १ प्रतिक्रिया »