Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

अजूनही …


तुला जाऊन आज ५ वर्ष झाली आणि लग्नाला ४५
पण मनात घर करून तूच आहेस
अजूनही …

तू या जगात नाहीयेस असं वाटतच नाही
सदैव माझ्या सोबतच असतेस
अजूनही…

तू बाहेरून आल्यावर पाय धुवायचीस
ते तुझ्या ओल्या पायाचे ठसे बघतो दिसतात का
अजूनही…

तुझी ती आवडती गुलाबी कलकत्ता साडी
धुवून इस्त्री करून कपाटात ठेवतो
अजूनही…

स्वयंपाकघरात काम करताना तुटलेली बांगडी ठेवायचीस खिडकीच्या कट्ट्यावर
लक्ष्य जातच त्या कट्ट्याकडे
अजूनही…

तुला मी दिलेली पहिली भेटवस्तू चांदीचे पैंजण
कपाटात जपून ठेवलेत
अजूनही…

रोज रात्री झोपेत कुशीवरून वळताना
बांगड्या खुळखुळण्याचा आवाज येतो
अजूनही…

जरी नसलीस बरोबर तरी
दिवसभरात घडलेलं सगळं तुला सांगतो
अजूनही…

कायम प्रेझेंटेबल असावे…


आजुबाजुला बघितल्यावर, कोणाकोणाच्या घरी गेल्यावर, ऑफिसमध्ये लोकांना पाहिल्यावर असं फार वाटायला लागलाय कि प्रत्येकानी कायम प्रेझेंटेबल राहावे. आणि आपल्याला प्रेझेंटेबल पाहून समोरच्याला पण बरे वाटते. स्वतःलाच छान वाटतं, फ्रेश वाटतं ते वेगळं. आता प्रेझेंटेबल म्हणजे सदैव फॅशनेबल कपडे घालून मिरवायला नको. रोजच्याच कपड्यात आपण प्रेझेंटेबल राहू शकतो. हे सगळं सांगायला मी आजिबात फॅशन गुरु वगैरे नाहीये माझ्या कडे पण पाठीवर भोक पडलेला बनियन आहे आणि तो मी (बायकोचं लक्ष्य नसताना) घालतो. पण मी तो असा नाही घालणार कि शर्टातुन ते भोक सहजगत्या दिसेल. गडद शर्टातुन दिसणार नाही असा घालीन.
काही सर्वसाधारण निरीक्षणे नोंदवित आहे. खरेतर या गोष्टी स्वतःलाच समजल्या पाहिजेत किंवा फारतर आई वडिलांनी तरी शिकवल्या पाहिजेत. आता आई वडीलच जर मुलं गाडीवर बरोबर घेऊन सिग्नल मोडणाऱ्या कॅटेगरीमधले असतील तर बोलायलाच नको.
१) ऑफिसला शर्ट पॅन्ट कायम इस्त्री करून वापरावेत. इस्त्री करायला वेळच मिळाला नाही हे धादांत खोटे कारण आहे.
२) केस कायम भांग पाडून व्यवस्थित सेट करावेत. कटिंगचे पैसे वाचवायला दोन कटिंग मधील अंतर वाढवून स्वतःच्या केसांचे भूत करून घेऊ नये. मोठ्या केसांची स्टाइल असेल तर ती नीट मेंटेन करावी.
३) सॉक्स दररोज धुतलेले वापरावेत. एकच सॉक्सचा जोड आतली बाजू बाहेर आणि बाहेरची बाजू आत करून वापरू नयेत.
४) बुटांना चकचकीत पॉलिश करून वापरावेत. बुटांवरून व्यक्तिमत्व्याची झलक येते. झीजलेल्या सोलचे बूट, बुटांवर चिरापडून फाटलेले बूट बाद करावेत.
५) खिशात कायम रुमाल ठेवावा आणि शिंकताना / खोकताना आवर्जून वापरावा. उगाच सगळीकडे तुषार सिंचन करू नये.
६) नाकातले केस वाढून नाकाच्या बाहेर येऊ देऊ नयेत. त्यांना मिशांमध्ये तर आज्जिबात मिसळून देऊ नका.
७) मिशा असतील तर मिशांची चहा / दूध पिताना काळजी घ्या. कित्ती लोकांना चहा / दूध पिताना त्यात मिशा बुडून त्या पण ते पितात हे कितीवेळ कळतच नाही. समोरच्या माणसाला हे दृश्य दाखवून केविलवाणे करू नये.
८) कानाच्या पाळ्यांवरचे केस वेळोवेळी कापावेत.
९) दाढी सुद्धा सगळीकडून नीट करावी. किती लोकांचे दाढी करूनसुद्धा मानेजवळ दाढीचे शिल्लक राहिलेले खुंट तसेच असतात.
१०) नखे सुद्धा वेळेवर कापावीत. उगाच अंगठ्याची, करंगळीची नखे बोटाच्या उंची इतकी वाढवू नयेत. शक्यतो नेलकटर वापरावे. सर्वांसमोर तोंडात बोटे घालून नखे खाऊन तिथल्या तिथे फुंकर मारून टाकू नयेत.
११) चारचौघात बसून नाकात बोट घालून गिरवू नये. नाकातली घाण टेबलाला, भिंतीला अजिबात पुसू नये. हात स्वच्छ धुवून यावेत.
१२) वरचा मुद्दा डोळ्यातल्या घाणीला पण लागू होतो.
१३) तोंडाला पावडर लावत असलाच तर अगदी चेहऱ्याचा खारादाणा होऊ देऊ नये.
१४) बनियन जर बाहीचा असेल तर शर्टमधून त्याच्या बाह्या बाहेर येऊ देऊ नयेत.
१५) आपल्या अंगाला आजिबात घाण वास येत नाही असा गैरसमज समज समजा नसेल तर छानसा डिओडरंट वापरायला हरकत नाही. ऐपती प्रमाणे डिओडरंट / परफ्युम मध्ये खुप विविधता आहे त्याचा फायदा घ्यावा.
आता या गोष्टी सांगायला मी काही फार ढुडडाचार्य नाहीये. पण या नक्कीच खटकणाऱ्या गोष्टी आहेत. आणि अवलंबायला सुद्धा सोप्या आणि फारच स्वस्त आहेत. म्हणून जरा स्वतःची पडताळणी करून बघायला काहीच हरकत नाही.या गोष्टी म्हणजे पटल्या तर घ्याव्यात अन्यथा मला लागू होत नाही असे म्हणून सोडून द्याव्यात. माझ्याकडून कोणते निरीक्षण अवधानाने राहून गेले असेल तर नक्की सूचित करावे.

ती ची कहाणी – भाग- १


आपल्याला दमलेल्या बाबाची कहाणी नेहमी ऐकू येते पण कधीच दमलेल्या ति ची कहाणी ऐकू येत नाही. तीची खरं तर खूप रूपं आहेत. ती लहान असताना बाबाच्या गळ्यातला ताईत असते, मोठी झाल्यावर कोणाची प्रेयसी होते, मग त्याची बायको होते, मग ती कोणाची तरी आई होते. मुलं थोडी मोठी होत आहेत तोवर थकलेल्या बाबाची ती परत आई बनते आणि आजी तर ती झालेली असतेच. ती कधी थकतच नाही. म्हणूनच थकलेल्या तिची कहाणी कधी आलीच नसावी.

लग्नाआधीची ती एकदा दमते तेव्हा….. म्हणजे दमल्ये असं वाटत तेव्हा…

दुपारी बरोबर ४ ला तिचा मेसेज आला.

“५.३० ला टपरी पाशी भेटू. बाय.”

नेमका मी होतो मीटिंग मध्ये म्हणून तिला मेसेज करता येईना. ४.१० ला परत दुसरा मेसेज.

“काय रे येतोयस ना?”

मीटिंग मध्ये मी नेमका मेनेजरच्या शेजारी बसलो होतो म्हणून मला मेसेज पण करता येईना. पण हळूच तिला येतोय असा मेसेज टाकला. नंतर मीटिंग संपेपर्यंत तिचे २ मेसेज आले हार्ट आणि लव यु लव यु लिहून पाठवलेले. मी म्हणालो बाईसाहेब आज एकदम खुशीत दिसतायत.

टपरीवर पोचतो ना पोचतो तोच ती धापा टाकत आली. आणि म्हणाली “कश्शी बश्शी घुसले त्या बसमध्ये. असली गर्दी होती म्हणून सांगते आज .”
आमच्या टपरीची जागा म्हणजे अशी एकदम दिलखेच होती. गावातल्या तळ्याच्या कठड्यावर आम्ही पाय सोडून असे संध्याकाळी गुचू गुचू करायला भेटतो.आणि ते टपरीवाले मानेकाका आम्हाला आता चांगलेच ओळखतात म्हणून आम्ही आलो की आमचा स्पेशल चहा आमच्या समोर असतो.

आज आम्ही कट्ट्यावर बसलो आणि ती एकदम मला बिलगून बसली. माझा उजवा हात घट्ट धरून खांद्यावर डोकं ठेवून स्थिरावली. आणि म्हणाली जरा वेळ काहीही बोलू नकोस अगदी हु की चू पण करू नकोस. आज मी जाम वैतागले आहे आणि दमल्ये पण. मी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि म्हणालो की ओके. तिनी माझा हात हातात धरला होता. मी माझ्या करंगळीनी तिच्या हाताच्या तळव्यावर असं वर खाली केला. तशी ती एकदम ओरडली. शांत बस म्हणून बोल्ल्ये ना एकदा. सगळीकडे एकदम अशी निरव शांतता पसरली. आम्ही दोघे एका ट्रान्स मोड मध्ये गेलो होतो. आत्ता आमची अशी स्तिथी होती ज्याला आम्ही “काही नको अवस्था” म्हणतो. “काही नको अवस्था” म्हणजे अशी स्तिथी की ज्यात आम्हाला हा काळ संपेपर्यंत बसून रहावसं वाटतं. अगदी खायला नको की प्यायला नको. दो दिल एक जान सारखा एकमेकांचा सहवास हवा असतो. सुख म्हणजे नक्की असच असावं असं आम्हाला वाटतं.

असो जरा विषयांतर झालं खरं. मग आम्ही १ तासभर तसे बसून होतो.
सध्या तिच्या ऑफिसमध्ये एका डेडलाईन साठी कामाचे खूप प्रेशर आहे. त्यामुळे दर दोन दिवसातून एकदातरी ती त्या मेनेजर वर भडकलेली असते.
नंतर तिच्या आईचा मेसेज आला घरी कधी येत्येस म्हणून आणि आमची समाधी भंग पावली. मला म्हणते आई शप्पथ काय बरं वाटलंय म्हणून सांगते तुझ्या जवळ बसून. माझा थकवा, शीण कुठल्या कुठे पळालाय. मी आत्ता परत ऑफिस मध्ये जाऊन नव्या जोमानं काम करू शकते.

मी म्हणालो चला आता घरी जाऊया. तुझ्या आईचा फोन येईल निघाली नाहीस तर.

क्रमश:

हवे “हवेतले ” दिवस…


मालती: काय हो कुठपर्यंत पोचले असतील?

मी: अगं आत्ता तर निघाली सगळी १ तासापूर्वी अजून लोणावळ्यापर्यंत पण नसतील पोचले.

मालती:  मी फोन करून बघू का एकदा?

मी: अगं असं वेड्या सारखी काय करतेस? राम म्हणाला ना कि आम्ही विमानतळावर पोहोचून बग्स दिल्या की खुशालीचा फोन करतो म्हणून?

मालती: अहो माहिती आहे मला. तुम्ही जरा गप्पं बसा बघू.

मी: मला माहित्ये की तु फोन केल्याशिवाय शांत बसणार नाहीस. तर कर मग फोन एकदाचा.

५ मिनिटांनी …

मालती: अहो अजून लोणावळ्याला पण नाही पोचले ते.

मी तिचं बोलणं मान आडवी हलवत ऐकत होतो. मी फक्त हो का एव्हढच बोललो.

मालती: होय हो माहिती आहे सांगत होतात. सर्वज्ञानी आहात तुम्ही माहित्ये?

मी: बर ठीके, चहा करतेस का?

मालती: अहो आत्ता तर सगळे जायच्या आधी झाला चहा तुमचा.

मी: तू करणार आहेस कि मी करू?

मालती: नको, करते मी. नंतर आवराआवरी मलाच करावी लागते.

मालती पदर खोचून आत जाते आणि माझीही नजर खिडकीत दूर क्षितिजावर स्थिरावते. आभाळ एकदम भरून आलं होते. जणू काही त्याला पण समाजत होत की राम पुण्यातली सुट्टी संपवून परिवारासह अमेरिकेला परत चाललाय. सर कधी पण बरसू शकते. मी जास्तीतजास्त मन घट्ट करून वावरत होतो.

मी विचार करू लागलो कि ही शांत झालेली लगबग, चालू झाली ती सहा महिन्यान पूर्वी, डिसेंबर मध्ये.

मी असा एकदम सर्रकन भूतकाळात गेलो.

रामशी स्काईप वर बोलताना तो म्हणाला की आई आणि बाबा ऐका आम्ही सगळे मे महिन्यात सुट्टीसाठी भारतभेटीवर येण्याचा प्लान करतोय. तो म्हणाला की त्याला ३ आठवड्यांची सुट्टी मिळणारे म्हणून खास आंब्यांच्या सिझन मध्ये सुट्टी  प्लान करतोय. तो म्हणाला की मुलांच्या शाळांना सुट्टी लागली रे लागली आम्ही निघणार.

हे ऐकल्यापासून आमच्या दोघांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. राम तब्बल ३ वर्षांनी घरी येणार या कल्पनेनीच आम्हाला भरून आले.

त्यापुढच्याच आठवड्यात त्यांनी तिकीट काढली असं सांगितले आणि आम्ही दोघे हातातली सर्व कामे सोडून नवीन वर्षाचे कॅलेंडर घेवून त्याची पाने पटापटा उलटू लगलो. कधी एकदा मे महिन्याचे पान समोर येतंय असं झालं होत  आम्हाला. एकदाचा मे महिना दिसला आणि आम्ही ते ३ आठवडे पाहू लागलो. मालती त्या मे महिन्याच्या कॅलेंडरच्या पानावरून असा हळुवार हात फिरवू लागली.

मग काय मालती वही पेन घेवून त्यांच्या सुट्टीचा प्लानच करू लागली. कि ३ दिवस तर कुलदेवाला जाऊन येण्यात जातील. मग मी सर्वांना बोलावून एक छानसं गेट टु गेदर करणारे, आणि मग ….

मी तिला न राहवून म्हणालो अगं तू त्यांच्या सुट्टीचा प्लान करत्येस खरी पण त्यांनी त्यांचा प्लान तिकिटे काढायच्या आधीच निश्चित केला असणार. ३ वर्षांनी येणारेत ते.

मालती: तुम्ही न माझ्या सगळ्या कामांनाच खोडा घालता नेहमी.

मी: अगं असं काय करतेस? रामचं केवढ मोठ मित्र मंडळ आहे, पूर्वाच्या बहिणीच लग्न आहे  म्हणून पूर्वाला सुद्धा तिच्या माहेरी राहायचे असणारे आणि हे तुझे प्लान्स?

मालती: बर पण कुलादेवीला जायच्या बाबतीत मी कोणाचेच ऐकणार नाहिये. तुम्ही कोणी आला नाहीत तर मी एकटी जायला कमी करणार नाही. आणि हो गेट टु गेदर सुद्धा करणारे.

मी: बर ठीक आहे पण त्यांना अजून या बद्दल काही बोलू नकोस. आधी त्यांचे प्लान्स ऐकून घेवू आणि मग त्यामध्ये हे तुझे प्लान्स आपण बसवु. कसे?

अजून जानेवारी उजाडला नाहीये आणि मालती म्हणजे कंबर कसून कामाला लागली आहे. तिनी मोलकरणीला सुद्धा आगावू सूचना देवून ठेवली आहे कि मुलगा, सून आणि नातवंड आल्यावर एकपण दिवस खाडा मारायचा नाहीये. अगदी रोज सांगत्ये तिला. या बाईनी कंटाळून तोवर काम सोडलं नाही म्हणजे मिळवलं .

एव्हाना आमच्या सर्व नातलगांना, आप्तेष्टांना, बिल्डींग मध्ये राम येण्याची बातमी पसरली होती. कोणी म्हणून सांगायचे राहिले नव्हते.

यंदा आमची दिवाळी मे महिन्यात येणार होती. राम अमेरिकेला गेल्यापासून दिवाळी काय असून नसून सारखीच असल्या सारखी झाली होती. आपली सर्वजण  साजरी करतात म्हणून त्यात आम्ही पण . आम्ही म्हणजे रामच्या येण्याच्या वाटेवर चातकासारखी वाट पहात  बसलेलो असतो.

बघता बघता मार्च येवून ठेपला आणि मालातीची कुरडया, पापड, बटाट्याचा कीस करायची तयारी चालू झाली. म्हणे अगदी वर्षभर पुरतील इतके जिन्नस बरोबर पाठवणारे. करुदे काय करायचे ते. तेवढाच तिचा वेळ जातोय तर जाउदे. राम आणि पूर्वा ठरवतील काय आणि किती घेवून जायचं.

तशी माझी पण काही कमी तयारी चालू नव्हती. नातवंडांसाठी बॅंकेत ठेवलेल्या ठेवी मोडून त्यांच्यासाठी आयुर्विम्याच्या पॉलीसी घ्यायच्यात, आमच्या राहत्या घरात रामला नॉमिनी म्हणून टाकायचय आणि महत्वाचं  म्हणजे राम, पुर्वा आणि दोन्ही नातवंडांचं  आधारकार्ड काढायचय, नातवंडांची नावे रेशन कार्ड वर टाकायची आहेत.

बघता बघता एप्रिल संपून मे महिना उजाडला. आम्हाला आत्तापर्यंत मे महिना इतका सुखद, शीतल कधीच वाटला नव्ह्ता. राम यायच्या वेळी पिकतील अशा आंब्याच्या पेट्या घरी दाखल झाल्या होत्या. त्या २ / ३ दिवसांनी उघडून आंबे वर खाली करून बघण्याचे काम माझ्याकडे आले होते.

सोनियाचा दिनू येवून पोचला होता. राम घरी यायला काही तासांचा अवधी शिल्लक राहिला होता. मालतीने राम पूर्वाच्या आवडीचा खास मेनू केला होता.

ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग

मी: हा कोण बोलताय? राम का? हां बोल. कुठे आहेस? हां ओके हां हां. ठीके या मग.

मालती: अहो फोन ठेवलात पण? मला बोलायचं होता ना!! आणि नुसते हां ओके ओके काय करताय? आत्ता कुठे होता तो? प्रवास कसा झाला? कधी पर्यंत घरी पोचतोय? एकही प्रश्न विचारला नाहीत. लावा परत त्याला फ़ोन. पहिला लावा आणि मलाच द्या बोलयला.

मी: अगं मला बोलून देशील की नाही? जरा दम धर. राम १ तासात घरी पोचत आहे. त्याचा प्रवास वेळेत झाला. आणि बाकीचे प्रश्न तो आल्यावर तूच समक्ष विचार. पण हो त्याला येवून जर बसुदे मग विचार सगळ.

टिंग ताँग टिंग ताँग टिंग ताँग टिंग ताँग टिंग ताँग

आला राम आला. इतका मोठा झाला तरी अजून बेल तश्शीच वाजवतो.

दुसऱ्या दिवशी पूर्वानीच कुलदेवीच्या दर्शनाला जायचा विषय काढला आणि मालती म्हणे हो न जाऊन येवू आपण. अगदी कस मनासारखा होत होत.

दिवस असे गोजिरवाणे पण भूर्रकन  जात होते.

बघता बघता आधारकार्ड निघाले, रेशनकार्ड वर नातू  एड झाले, तशी रामची परत जायची तारीख पण अशी समोर दिसू लागली. मला पण २ महिने खंड पडलेला ज्येष्ठ नागरिक कट्टा दिसू लागला.

आणि राम जायची वेळ येवून ठेपली. त्याच्या जाण्याची सगळी तयारी झाली होती. आमच्याच मनाची होत नव्हती.  रामचे फोन चालू होते. त्याच्या मित्राची गाडी या सर्वांना पुण्याहून मुंबईला विमानतळावर सोडणार होती. गाडी दाराशी आल्याचा एकच ओरडा झाला. मालातीनी सर्वांना ओवाळले आणि प्रत्येकाच्या हातावर दहीपोह्याचा गोळा ठेवला. सर्वांचे नमस्कार करून झाले तसा मालातीचा हात तिचा पदर शोधू लागला. हृदयांमध्ये कालावाकालव चालू झाली होती.

मालातीचा बांध फुटला आणि ती रामला विचारू लागली परत कधी येणारेस? आता परत येशील तो कायमचाच की  परत सुट्टीवर?

मी मालतीला जवळ घेवून रामला म्हणालो तुम्ही निघा, मुंबईला वेळेत पोचलं पहिजे. सर्व सामान गाडीत ठेवून जड अंत:करणाने सर्वांना निरोप दिला.

ते गेले तरी त्या वाटेकडे बघत आम्ही दोघे फाटकापाशी तसेच उभे होतो, कितीतरी वेळ …  असं वाटू लागलं याच गेल्या ३ आठवड्यांसाठी आम्ही गेले ६ महिने हवेत जगत होतो ते आता सरलेत. परत उद्या सकाळ पासून आम्ही दोघे, दुपारी पण आम्ही दोघे आणि रात्री पण.

तोच मागून मालातीचा आवाज आला अहो चहा घ्या. मी एकदम भानावर आलो. चहाचा एक घोट घेवून रामच्या खोलीत गेलो तर असं वाटू लागले आत्ता ही लोकं काही वेळापूर्वी इथे होती आणि आता नाहीत? समोर असे नातू बसलेले दिसत होते.  पटकन डोळे पुसले आणि मालातीबरोबर चहा पिण्यात रुजू झालो.

डेंटीस्ट नको नको …


मी जगात सर्वात कोणाला घाबरत असेन तर डेंटीस्टला. देवानी यांना जन्मालाच का घातले इथपासून प्रश्न पडायला सुरवात होते आणि लगेच मनात पण येते कि देवाने जन्माला घातले आहे म्हणून आपल्या तोंडात दात शाबूत तरी आहेत. तरी तमाम डेंटीस्टना अजून १०० वर्षे आयुष्य लाभू दे. कोणतीही टूथ पेस्ट वापरा, दात कितीही घासा, फ्लॉस करा तरी दातांचे व्हायचे तेच होणार असते. हेरीडिटीमुळे सर्व काही व्हायचे ते होत असते.

डेंटीस्ट म्हणालं कि सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं ते म्हणजे डॉक्टरांच्या हातातले सुईSSS करणारे दात कोरणारे यंत्र. या यंत्राची एक वेगळी दहशत माझ्या मनात बसली आहे.

डॉक्टर या मशीनला वेगवेगळ्या सुया लावायला लागले कि वाटते हे मला एकदाचे मारूनच का टाकत नाहीत. सगळेच प्रश्न सुटतील.
नंतर आठवते ते म्हणजे पाण्याची नळी ज्यातून ते गरम / गार पाण्याची पिचकारी दातावर मारतात. आणि या पाण्याचा स्पर्श त्यावेळी डोक्यात ज्या कळा मारून जातं ना ते भोगणाराच समजू शकेल.
नंतर नंबर लागतो तो त्या सक्शन नळीचा. ती आपले काम इमाने इतबारे करते.
नंतर ती वर खाली होणारी, रुग्णाला आरामदायी दिसणारी मऊ मऊ खुर्ची. बटण दाबले की रुग्ण आणि जीव दोन्ही वर खाली….
डॉक्टरांचे २ हात, त्यांच्या मदतनिसाचे २ असे चतुर्भुज हस्तानी आ वासलेल्या व्यक्तीच्या तोंडात ते युद्ध चालू असते. कितीही लक्ष्य द्यायचे ठरवले तरी त्या मागे चालू असलेल्या मंद मंद इनस्टुमेंटल गाण्यांकडे लक्ष्य लागत नाही. आणि डॉक्टर आपले ते गाणे गुणगुणत काम करत असतात.

असो तर ज्यांना हे माहित नाही त्यांच्या साठी ही इतकी तोंड ओळख आणि ज्यांना माहित आहे त्यांना उजळणी पुरेशी आहे.
तर आपल्या दातांची जास्तीतजास्त काळजी घेणे आणि डेंटीस्टला कमीत कमी भेट देणे यासाठी खालील काळजी घेता येते.

१) प्रत्येक जेवणानंतर दात कानाकोपऱ्यातून, व्यवस्थित घासावेत. ऑफिसमध्ये पण जेवणानंतर लोक काय म्हणतील याचा विचार न करता दात घासावेत. दात आपले आहेत. मग कोण काय म्हणाले तर त्यांचे दात घशात घालायला हरकत नाही.

२) कोक, पेप्सी सारखी घातक पेय जी दातांचे आयुष्य कमी करतात त्यांच्या पासून दूर राहिलेले बरे. आता दूर म्हणजे हद्दपार करणे असे नाही.
३) आबर-चबर खाऊन झाल्यावर खळखळून चुळा भरणे.
४) जराशी जरी दाताला कीड लागल्याची जाणीव झाली तर बिलकुल दुर्लक्ष्य करता कामा नये. Stitch in time, saves nine…..
ताबडतोप डेंटीस्टची भेट घेवून सोक्ष मोक्ष लावावा. हातची वेळ घालवली तर दात गमावण्याची वेळ येवू शकते. चांदी, सिमेंट, crown करून दात वाचवता येवू शकतो.
५) ते डॉक्टर / ते हॉस्पिटल अतिशय स्वस्तात दाताची कामे करून देतात. देत असतील स्वस्तात पण सर्वोत्तम करत असतील याची खात्री नाही. म्हणून माहितीतले चांगले काम करणारे, पैसे न काढणारे आणि तरी पण स्वस्तातले डॉक्टर मिळू शकतात.
६) उगाचच पिनेनी, टूथपिकने दात कोरत बसू नये.
७) जर आपल्या घरात खराब दातांची प्रथा असेल तर लहानपणापासूनच दातांची काटेकोर काळजी घ्यावी.

आपले दात हा आपल्या व्यक्तिमत्वाचा अतिशय महत्वाचा भाग आहेत. पांढरे शुभ्र मोत्यासारखे दात कोणाला आवडणार नाहीत. म्हणून त्यांची योग्य काळजी पण आपल्याच हाती आहे.