Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया
मी जगात सर्वात कोणाला घाबरत असेन तर डेंटीस्टला. देवानी यांना जन्मालाच का घातले इथपासून प्रश्न पडायला सुरवात होते आणि लगेच मनात पण येते कि देवाने जन्माला घातले आहे म्हणून आपल्या तोंडात दात शाबूत तरी आहेत. तरी तमाम डेंटीस्टना अजून १०० वर्षे आयुष्य लाभू दे. कोणतीही टूथ पेस्ट वापरा, दात कितीही घासा, फ्लॉस करा तरी दातांचे व्हायचे तेच होणार असते. हेरीडिटीमुळे सर्व काही व्हायचे ते होत असते.

डेंटीस्ट म्हणालं कि सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं ते म्हणजे डॉक्टरांच्या हातातले सुईSSS करणारे दात कोरणारे यंत्र. या यंत्राची एक वेगळी दहशत माझ्या मनात बसली आहे.

डॉक्टर या मशीनला वेगवेगळ्या सुया लावायला लागले कि वाटते हे मला एकदाचे मारूनच का टाकत नाहीत. सगळेच प्रश्न सुटतील.
नंतर आठवते ते म्हणजे पाण्याची नळी ज्यातून ते गरम / गार पाण्याची पिचकारी दातावर मारतात. आणि या पाण्याचा स्पर्श त्यावेळी डोक्यात ज्या कळा मारून जातं ना ते भोगणाराच समजू शकेल.
नंतर नंबर लागतो तो त्या सक्शन नळीचा. ती आपले काम इमाने इतबारे करते.
नंतर ती वर खाली होणारी, रुग्णाला आरामदायी दिसणारी मऊ मऊ खुर्ची. बटण दाबले की रुग्ण आणि जीव दोन्ही वर खाली….
डॉक्टरांचे २ हात, त्यांच्या मदतनिसाचे २ असे चतुर्भुज हस्तानी आ वासलेल्या व्यक्तीच्या तोंडात ते युद्ध चालू असते. कितीही लक्ष्य द्यायचे ठरवले तरी त्या मागे चालू असलेल्या मंद मंद इनस्टुमेंटल गाण्यांकडे लक्ष्य लागत नाही. आणि डॉक्टर आपले ते गाणे गुणगुणत काम करत असतात.

असो तर ज्यांना हे माहित नाही त्यांच्या साठी ही इतकी तोंड ओळख आणि ज्यांना माहित आहे त्यांना उजळणी पुरेशी आहे.
तर आपल्या दातांची जास्तीतजास्त काळजी घेणे आणि डेंटीस्टला कमीत कमी भेट देणे यासाठी खालील काळजी घेता येते.

१) प्रत्येक जेवणानंतर दात कानाकोपऱ्यातून, व्यवस्थित घासावेत. ऑफिसमध्ये पण जेवणानंतर लोक काय म्हणतील याचा विचार न करता दात घासावेत. दात आपले आहेत. मग कोण काय म्हणाले तर त्यांचे दात घशात घालायला हरकत नाही.

२) कोक, पेप्सी सारखी घातक पेय जी दातांचे आयुष्य कमी करतात त्यांच्या पासून दूर राहिलेले बरे. आता दूर म्हणजे हद्दपार करणे असे नाही.
३) आबर-चबर खाऊन झाल्यावर खळखळून चुळा भरणे.
४) जराशी जरी दाताला कीड लागल्याची जाणीव झाली तर बिलकुल दुर्लक्ष्य करता कामा नये. Stitch in time, saves nine…..
ताबडतोप डेंटीस्टची भेट घेवून सोक्ष मोक्ष लावावा. हातची वेळ घालवली तर दात गमावण्याची वेळ येवू शकते. चांदी, सिमेंट, crown करून दात वाचवता येवू शकतो.
५) ते डॉक्टर / ते हॉस्पिटल अतिशय स्वस्तात दाताची कामे करून देतात. देत असतील स्वस्तात पण सर्वोत्तम करत असतील याची खात्री नाही. म्हणून माहितीतले चांगले काम करणारे, पैसे न काढणारे आणि तरी पण स्वस्तातले डॉक्टर मिळू शकतात.
६) उगाचच पिनेनी, टूथपिकने दात कोरत बसू नये.
७) जर आपल्या घरात खराब दातांची प्रथा असेल तर लहानपणापासूनच दातांची काटेकोर काळजी घ्यावी.

आपले दात हा आपल्या व्यक्तिमत्वाचा अतिशय महत्वाचा भाग आहेत. पांढरे शुभ्र मोत्यासारखे दात कोणाला आवडणार नाहीत. म्हणून त्यांची योग्य काळजी पण आपल्याच हाती आहे.

सापडली एकदाची माझी बाळबोध कविता, हो ना १२ वर्षांपूर्वी १२ वीचा अभ्यास करता करता लिहिली होती. मी पार विसरून पण गेलो होतो. पण बाबांनी इतक्या वर्षांनी थेट बायकोच्या हातात दिली वाचायला कि हे बघ याचे जुने प्रताप.


मग विचार केला कि कायम संग्रही राहण्यासाठी ब्लॉगवरच टाकावी. एकून २ कविता आहेत पण आत्ता एकच इथे टाकत आहे. मी तरी याला कविता म्हणतो. तुम्ही काही पण म्हणू शकता अगदी पद्य, चारोळी, पाकोळी, मुक्त छंद, अगदी गद्य म्हणलं तरी चालेल.
कॉलेज मध्ये असताना र ला र आणि ट ला ट लावून अनेक गाणी केली होती. काही जुनी विद्यार्थीप्रिय गाणी वाढवली पण होती. जशी A B C D  सातारा त्यातून निघाला म्हातारा, अच्चीत गच्ची गच्चीत टाकी या प्रकारची गाणी आठवून आता हसू येते.
असो या आठवणींमध्ये माझे महाकाव्य प्रकाशित करायचे राहूनच जाईल. तर माझी बाळबोध कविता अशी आहे.

पक्षी उडत होते नभी
मी बसलो होतो घरी
वाटत होते उडावे
पक्ष्यांप्रमाणे…..


वाटत होते स्पर्शावे
निळ्या नभांगणाला
स्वार होऊन ढगावर
जावे दूर देशीला …..


वाटत होते या झाडावरून
त्या झाडावर बसावे
घरटे बांधून दोनाचे
दहा बारा हात करावेत


नुसते वाटून काय होणारे
खरे व्हायला पाहिजे
खरे होण्यासाठी आधी
पक्षी व्हायला पाहिजे


त्यावेळी कवी सदू हे नाव धारण करून कविता केली होती.


आज या कवितेचा प्रकाशन सोहोळा माझ्या एका तमिळ मित्राच्या हस्ते वाचन करून एकूण २ लोकांच्या अथांग जनसमुदायाच्या साक्षीने प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात पार पडला. त्या मित्राने नंतर या कवितेचा अर्थ काय असा प्रश्न विचारल्यावर मी त्याला अर्थ सांगितला आणि माझ्या कवितेच्या तमिळ आवृत्तीच्या प्रकाशनाचे सर्व हक्क पण दिले .

समजा ऑफिसमध्ये तुम्ही क्युबिकलमध्ये बसून काम करत आहात आणि अचानक पलीकडच्या क्युबिकल मधून कॉफी पिण्याचा जोरदार भुर्रूक भुर्रूक आवाज आला तर? ती कॉफी सुध्धा एकदम घट्ट दुधाची असावी, लापशी सारखी, फेस असलेली. मधूनच कपमध्ये चमच्यानी कॉफी ढवळण्याचा कडडम कडडम आवाज आला तर? आणि तो कडडम आवाज कॉफी संपेपर्यंत येत राहिला तर? सोबत बिस्कीट खाताना तोंडात डिंकाचे हजारो झरे फुटल्यामुळे येणारा पचाक पचाक आवाज येत असला तर??

भुर्रूक पचाक पचाक.. ऐकून अंगावर शिसारी आली. म्हणालो नक्की कोणीतरी देसी असणारे. कारण अमेरिकेत हे असलं वर्तन आपण एखाद्या देसीकडूनच अपेक्षित करतो.
उठून उभा राहिलो आणि बघितल तर काय? समोर साक्षात १ देसी संगणाकाकडे बघत तल्लीन होऊन चमचा त्या कपातल्या कॉफीत गरागरा फिरवत होता. नाव गाव समजल्यावर कळले कि तो १ NRI मराठी तमिळ आहे. म्हणाला कालच रुजू झालोय. काल तू सुट्टीवर होतास म्हणून भेट नाही झाली आपली.म्हणाला मी मद्रासी आहे पण जन्मापासून मुंबईकर असल्यामुळे तमिळ कमी आणि मराठी जास्ती येतं मला. मी बरं म्हणालो. मग त्यांनी कोणत्या प्रोजेक्ट साठी आलाय वगैरे सांगितलं.

त्या दिवशी त्याने जेवणाचा डबा आणला नव्हता म्हणून मी वाचलो नाहीतर दुसऱ्या दिवसापासून त्याने चळचळत्या लसून फोडणीच्या वासाचे, तर्रीवाले डबे उघडायला सुरवात केली. त्याचं खाऊन झाल्यावर १ तासभर आसमंतात तो वास दरवळत असायचा. मग मी एकदा त्याच्या बॉसला माझ्या क्युबिकल मध्ये कामानिमित्त बोलावले होते. तो आल्या आल्या म्हणाला वास कसला येतोय? मी पलीकडून असं बोट दाखवले. म्हणून त्याने डोकावून पहिले तर त्याला तिथे विश्वरूप दर्शन झाले. माझं न बोलताच काम झाले. मग यथावकाश त्याने त्याला सांगितले आणि ते वासू डबे बंद झाले.

तरीपण भुर्रूक पचाक पचाक चालूच होते. असाच एकदा तो तल्लीन होऊन कडडम कडडम करत असताना मी म्हणालो चमचा पण विरघळेल रे!! हळू ढवळ जरा. मग जरा आवाज कमी झाला.

मी विचार केला कि हा माणूस गेली ४ वर्ष अमेरिकेत असाच वागत आलाय कि काय? अवघड आहे याचे. घरी तू कसा पण का वाग ना. कोण काय म्हणणारे तुला.

मी असे म्हणत नाही कि मी एटिकेट्स चे पुस्तक कोळून प्यायलोय वगैरे पण कमीत कमी बघावे आपण कुठे आहोत, आजूबाजूचे लोक कसे वागत आहेत आणि आपण कसे वागतोय, आपण इथे काय करतोय?

अमेरिकेसाठी निघताना पुण्यात HR नी एक एटिकेट्सचा कोर्स करायला लावला होता. त्यात सगळं शिकवल होतं चारचौघात कसे खायचे, काटा चमच्यानी कसं खायचं, आवाज न करता कसं खायचं ई ई.

मला वाटतंय कि एकतर याने तो कोर्स नक्की बंक केला असणार किंवा त्या शिकवणाऱ्या मास्तरला तरी सगळं विसरायला भाग पाडलं असणार.

खरच कितीही थंडी वाजत जरी असली तरी जो पर्यंत सकाळ मध्ये लोक लक्ष्मी रस्त्यावर नेपाळी लोकांकडे खरेदीसाठी गर्दी करत आहेत असा फोटो येत नाही तोपर्यंत म्हणावी तशी थंडी पडलेलीच नसते. किंवा पडूच शकत नाही. आता मला काय कोणालाच माहित नसणार की या लोकांना नेपाळी का म्हणतात. कोणीही विचारलेला नसणारे. ते भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमधले पण असू शकतात. असो.

ई-सकाळ चा दुवा

ही थंडी मुळात चालू होते तीच सकाळ मुळे. सकाळ मध्ये पहिल्या पानावर १ फोटो येतो. या बातमीचे आणि फोटोचे शीर्षक असते “पुण्यात गुलाबी थंडीचे आगमन“ त्या फोटोत १ झाडांमधून जाणारा रस्ता असतो, त्या रस्त्यावरून १ सायकलस्वार चाललेला असतो. त्याच्या शेजारून १ आजोबा स्टाईलची व्यक्ती कानटोपी घालून चाललेली असते. आणि नुकताच सूर्योदय झाला असल्याने या फोटो मध्ये अशी सूर्याची किरणे त्या घनदाट झाडातून रस्त्यावर डोकावत असतात. रस्त्यात थोडेसे धुके पण असते. सो फोटोची एकून रंगसंगती, आणि त्यातली पात्रे योग्य परिणाम साधतात. आणि एकदाची पुणेरी गुलाबी थंडी पडते.

लोक भारानियामातून सुटका म्हणून खुश, लक्ष्मी रस्त्यावरचे विक्रेते त्यांच्या शॉपिंग फेस्टिवलची सुरवात म्हणून खुश. दुकानांमधून गरम कपड्यांचे सेल लागतात. टीव्ही वर च्यवनप्राषच्या जाहिराती येवू लागतात. साठ साल के बुढे या साठ साल के जवान अजून अजून बर्याच.
मागच्या वर्षीचे स्वेटर, काश्मिरी शाली, कानटोप्या, हातमोजे सगळं कपाटांमधून पटापट बाहेर येतात. लोक सकाळी टेकड्यांवर गर्दी करू लागतात. आणि अजून कित्तीतरी.
पुण्यापासून दूर आल्यापासून या सगळ्याच गोष्टींची कमतरता अशी विचार करूनच भरून काढावी लागते.

काय संबंध मुख्यमंत्र्यांचा या पुजेशी? मुख्यमंत्री झाले म्हणून काय लयी भारी झाले कि काय? वारकरी ३० ३० तास रांगेत थांबतात दर्शनासाठी आणि हे आपले सहकुटुंब गळ्यात हार तुरे घालून पूजा करताना फोटोसेशन करणार. काल ई-सकाळवर पण या बद्दल १ वृत्त वाचले.बर्याच लोकांनी याबद्दल आवाज उठवला आहे. हा आवाज आषाढ संपताक्षणी आसमंतात विरून गेला नाही म्हणजे मिळवलं.

खरेतर यासंदर्भात याआधीच उपाय योजना करायला हवी होती. ई-सकाळच्या लोकांनी याला वाचा फोडून खूपच स्तुत्य काम केलेले आहे.

भेळेच्या धंद्याला तसं म्हणालं तर मरण नाहीच. मंदी असो वा नसो, सिझन कोणताही असो, भेळ हि खावी लागतेच. म्हणजे कोणी खाण्याशिवाय राहूच शकत नाही. एक जमाना असा होता मी आणि मित्र न चुकता सलग २ ते ३ वर्ष रोज भेळ खायचो. अगदी रोज, न चुकता, तरी कंटाळा वगैरे कधीच नाही आला. आणि आता अमेरिकेत आल्यापासून अगदी तरसतोय भेळेसाठी. इतक्या ठिकाणी भेळ खाल्ली तरी गणेश भेळेसारखी सारखी भेळ कधीच आणि कुठेही खाल्ली नाही. बेंगळूरूला असताना भेळ खायची हुक्की आली म्हणून एका ठिकाणी भेळेची ओर्डर दिली आणि मला प्लेट मध्ये जे काही मिळाले त्याला मी काही केल्या भेळ म्हणायला तयार नव्हतो. त्या प्लेट मध्ये असा त्रिकोणी रचलेला भेळेवजा चुरमुर्यांचा लगदा होता. अगदी गचगचीत ओली भेळ. त्याला न चव ना ढव. मी म्हणालो भेळ दिली आहे का कालवलेला दक्षिणात्य भात? तो कानडी मित्र मिटक्या मारत खात होता. मी त्याला म्हणालो एकदा पुण्या मुंबईची भेळ काय असते खाऊन बघ. परत कधीही मी तिथे असे पर्यंत भेळेच्या वाटेला गेलो नाही. भेळेशिवाय अगदी उपासमार चालू होती.

आता पुण्यात भेळ खायची तर कुठे? जसं मिठाई साठी चितळे बंधू तसं भेळेसाठी गणेश भेळेशिवाय दुसरं दुकान / गाडी असूच शकत नाही. त्यांची पहिली गाडी लागायची ती कर्वे रोड वर आत्ताचे Mac’D आहे ना त्या लेन च्या जवळ. मग तिथून ती गाडी कर्नाटक हायस्कूल च्या समोर प्राची / अतिथी हॉटेल पाशी असायची. नंतर त्यांनी भरतकुंज सोसायटी मध्ये १ दुकान थाटले आणि आता या  गणेश भेळेच्या पण पुण्याच्या उपनागत अनेक ब्रान्चेस आहेत.  याशिवाय अजूनही काही प्रसिद्ध भेळवाले आहेत. जसे कॅनॉल वरची भेळ (SNDT कॉलेजच्या कॅनॉल वरून लॉ कॉलेज रस्ता क्रॉस करून तसेच पुढे गेल्यावर उजव्या बाजूला हे भेळ मिळते ), पुष्करिणी भेळ (बहुतेक अप्पा बळवंत चौकाच्या जवळ एक शूज चे दुकान आहे त्याच्या जवळ मिळते. दुकानं अवघे काही तासांकरिता उघडते), नवरंग भेळ (फडतरे चौकात शर्मिली दुकानाला लागुनच आहे हे दुकान). कर्वेनगरला ताथवडे उद्यानाजवळ एक भेळेचे दुकान आहे. अगदी गणेश भेळेच्या तोडीची भेळ मिळते इथे. त्याचा नाव विसरलो मी. बहुतेक विशाल भेळ असावे…. याशिवायही भेळेचे चोचले पुरविण्यासाठी सर्व बाग / उद्यानांबाहेर अनेक भेळ वाले आहेत, ते आपापल्या परीने प्रयत्न करत असतात.

आता भेळ खायला गेल्यावर नुसताच खेळ खाऊन घरी असं सहसा होत नाही. मग आलोच आहे तर पाणी पुरी , SPDP, रगडा पुरी पण होऊन जाऊदे असं होते. घरी कितीही म्हणालं की भेळ करू तरी त्या घराच्या भेळेला “त्या” भेळेची सर कधीच येत नाही.

भेळ खाताना जीभ झोंबून डोळ्यातून पाणी आलं की जे वाटतं ना की हाह आता बरे वाटले त्याला म्हणतात चटपटीत खाल्ल्याचे समाधान. आत्मा तृप्त होणे, ब्रह्मानंदी टाळी वाजते म्हणजे काय ते हेच असावे.

आज जिम मध्ये स्टीम बाथ घ्यायला बसलो होतो. शेजारी एक अमेरिकन आर्मी मधला सांड जवान येवून बसला. एकमेकांना हाय हेलो केल्यावर दुसरं वाक्य म्हणाला की तू कोणत्या चर्च मध्ये जातोस? त्याने सांगितला की तो कुठे जातो, आठवड्यातून कितीवेळा ई. मी असं ऐकून आहे की या चर्चचे बरेच प्रकार असतात. मी त्याला म्हणलो की मी चर्च मध्ये नाही जात. मी देवळामध्ये जातो. तो म्हणाला म्हणजे काय? मी म्हणालो की मी हिंदू आहे म्हणून प्रार्थनेसाठी देवळात जातो. हे ऐकून त्याला काय झाला काय माहीत, तो जो सुटला ना….

मला ख्रिश्चन धर्माची महती सांगू लागला. झिझसचे असं आहे तसं आहे. चर्च मध्ये असं असतं याव आणि त्याव. मग म्हणालो याच्या आयला..मी पण चालू झालो.

त्याला हिंदू धर्माची महती सांगू लागलो. जवळ अर्धा तास ही विचारांची तीव्र देवाण घेवाण चालली होती. मला म्हणे आमचा धर्म सांगतो की प्राण्यांना मारा आणि आपली भूक भागवा. मी म्हाणालो आमचा धर्म अहिंसेवर विश्वास ठेवतो. त्याला म्हणालो आम्ही प्रत्येक प्राण्यात देव आहे असं समजून वागतो. म्हणालो मी आजतागायत मास भक्षण केले नाहीये. गाय ही आम्हाला देवासारखी असते. आम्ही तिला खात नाही. त्याचा सांगण्याचा पवित्रा असा होता की त्याचा धर्म लयी भारी आणि आम्ही कोण कुठले.  त्याला अगणिक ठिकाणी मी क्रॉस केल्या वर बराच नरमला होता. एकतर त्या स्टीमबाथ रूम मध्ये इतका वेळ बसून माझा उकडलेला बटाटा होण्याची वेळ आली होती. पण म्हणालो ही संधी दवडता कामा नये. त्याला म्हणणार होतो की तू भारी असशील, तुझा धर्म तुझ्या साठी भारी असेल पण त्यामुळे माझा धर्म कमी प्रतीचा होत नाही. ऐवजी मी म्हणालो की माझा धर्म मला समानतेची शिकवणूक देतो. दुसर्या धर्माचा असला तरी तो आमच्या साठी हीन दर्जाचा होत नाही.

आपलं श्रेष्ठत्व २ प्रकारे सिद्ध करता येतं. एक तर स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करणे किव्वा दुसऱ्याला आपल्या पेक्षा कमी दर्जाचा सिद्ध करणे. या मुर्खासाठी दुसरा उपाय निवडला. त्याला मी शेवटच्या बॉल वर six मारून गार केले. त्याला म्हणालो आम्ही हिंदू धर्मात बळजबरीची  धर्मांतरं  करत नाही. हिंदुत्व ही जगण्याची एक पद्धत आहे. तुम नाही समझोगे….. तो गप्पच बसला.मग त्याला म्हणालो तुझे व्यूज ऐकून बरं वाटला. परत भेटलास तर उलटी मारीन.

कॉलेज जीवनातील खरी मजा ही घरी न सांगताच केलेली आठवते. या सुखद घटना अगदी काल घडल्या सारख्या वाटत आहेत.

१२वी  नंतर BCS ला प्रवेश घेतला. काही दिवसातच हा भला मोठा ग्रुप जमला. त्यात एकून टाळकी २०, यात निम्म्या मुली होत्या. सगळेच मध्यमवर्गातील. त्यामुळे सर्वांकडे खर्चायला पैसे हे पण मर्यादितच असायचे. व त्या मर्यादेत सुद्धा इतकी मजा केली की आता वाटतं की जास्त पैसे असते तरी अशी मजा नसती आली. त्यावेळी मोबाईलचे आजच्या सारखे प्रस्थ नव्हते. हल्ली तर सातवी आठवी पासून पोरं मोबाईल बाळगतात.

घरी खरी कॉलेज ची वेळ माहीत कुठे होती. सकाळी ८ ला कॉलेज भरते  इतकच माहीती. त्यामुळे दिवसभर हुंदडून घरी यायला ४ वाजायचे. आल्यावर अबरचबर करून झाले कि लगेच गणिताच्या क्लासला बाजीराव रोड वर …. प्रा. मनिषा देशपांडे याच्या वर्गात. इथे परत सर्व ग्रुप शेजारी शेजारी म्हणजे धमालच. त्या प्राध्यापिका MD यावानेच ओळखल्या जातात. BCS ला गणितात जो काही पास झालो तो त्यांच्यामुळेच. परत क्लास वरून घरी येईपर्यंत जेवणाची तयारी झालेली असायची. थोडक्यात काय तर घर म्हणजे अक्षरशः लॉजिंग आणि बोर्डिंग झाले होते.

बर आता इतका मोठा ग्रुप म्हणजे छोट्या छोट्या औटींग ट्रिप्स या अनिवार्य असायच्या. त्यात पुण्याला लागुनच अनेक ठिकाणे आहेत. जसे सिंहगड, खडकवासला, पानशेत, मुळशी, भुशी. ही लिस्ट संपणार नाही. या सर्व ठिकाणांना ३ वर्षात मिळून कोटी वेळा तरी गेलो असू. सगळी ठिकाणे साधारण ५० कि.मी च्या अंतरावर असल्याने कॉलेज सुटायच्या वेळी निघून सगळे क्लास च्या आधीपर्यंत सहज घरी पोचायचे. बर इतक्या ट्रिप्स झाल्या तरी कोणाच्याच घरी माहित नाही.कुठे जायचा म्हणाला की सर्व मैत्रिणी एका पायावर तयार. आई बाबा नेहमी सांगायचे की गाडी घेवून दिली आहे ती कॉलेजला जाण्यासाठी. पोरी फिरवायला नाही. जर आम्हाला कधी समजलेना की  पोरी फिरवतो आहेस तर गाडी काढून घेणार. मी पण जोरात हो म्हणायचो.

इतक्या ट्रिप्स केल्या त्यातल्या ९०% ट्रिप्सच्या वेळी माझी गाडी पंक्चर व्हायची. अगदी ठरवून माझीच बर का. दुसऱ्या कोणाचीही कधीही झाली नाही. आधी वाटायचं की माझ्या गाडीमुळे होत असेल. म्हणून चालवायला मी दुसरी गाडी घ्यायचो. तरी नियमात बदल हा नाही. मी जी गाडी चालवीन ती पंक्चर व्हायची ती व्हायचीच. पण यामुळे सगळ्या ट्रिप्स चांगल्याच लक्ष्यात राहिल्या सर्वांच्या.

एकदा नुकताच सिंहगड वारी उरकून आलो होतो. आणि शेजारच्या काकू आईला सांगत होत्या “अहो त्या जोशांचा बंड्या आहे ना तो परवा म्हणे कॉलेजच्या पोरींबरोबर खडकवासल्याला भिजायला म्हणून गेला होता. कशी काय यांच्या घराची लोकं यांना सोडतात देव जाणे.” त्या काकूंना एक मुलगी होती. भोचक भवानी होती एकदम. तिच्या कृपेने त्या कायम अपडेटेड असायच्या.  मी आपलं ते ऐकून तिथून पोबारा केला. म्हणालो जपून राहिलेला बरे.

पूर्वी अमेरिकेतले मित्र किंवा clients म्हणायचे कि आज काय मस्त ब्राइट सनी डे आहे. मस्त सूर्य प्रकाश पडला आहे. हे ऐकून वाटायचा काय वेडे आहेत कि काय? या तळतळात करणाऱ्या अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाला चांगला म्हणत आहेत. पण आत्ता अमेरिकेत आल्यावर समजले ते असा का म्हणायचे.

परवा अशाच एका मस्त दिवशी नकळतपणे मीच म्हणून गेलो कि आज किती मस्त ब्राइट सनी डे आहे. तेव्हा माझी ट्यूब पेटली. त्याचा होतं असं कि अमेरिकेतले हवामान इतका बेक्कार आहे ना कि काही करायची सोय नसते. हिवाळ्यात एकतर कडाक्याची थंडी असते आणि सगळीकडे बर्फ असते. म्हणून कुठेही असं फिरायला गेला आहात असं होत नाही. थंडीमुळे सर्व झाडांची पानगळ झालेली असते. झाडे सुद्धा भकास दिसतात. त्यात सोने पे सुहागा म्हणजे हवा ढगाळ असते. कि सगळंच संपलं. पाउस सुद्धा अधून मधून म्हणजे सारखीच हजेरी लावत असतो. त्यामुळे ढगाळ हवा ही ओघानी आलीच. मग असा मस्त ब्राइट सनी डे असला कि सगळे लोक बाहेर पडतात. हॉटेल मध्ये गर्दी होते, शॉपिंग मॉल गर्दीने फुलून जातात. छान छान मुली सुंदर सुंदर कपडे घालून बाहेर पडतात. कि मन कसे प्रसन्न होऊन जाते. मन ताजेतवाने करण्यासाठी अमेरिकन सरकार अधून मधून अशा मस्त दिवसासाठी निसर्गातसुद्धा हस्तक्षेप करत असले पाहिजेत.

कोणत्याच टीमने पाकिस्तानी खेळाडूंसाठी बोली लावली नाही आणि त्यामुळे सध्या बराच वादंग उठला आहे. याबाबत ज्या काही लोकांची मी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यापैकी बहुतांशी लोकांनी जे झाला ते अतिशय चांगलं झालं अशी टिप्पणी केली. मला सुध्धा  खूप बरे वाटले, मनाला शांती लाभली. काही लोक म्हणत होते हे झालं ते चुकीचे आहे. खेळामध्ये राजकारण आणणे बरोबर नाही. तुम्ही लोक खेळाचा आनंद लुटा, आणि आपापसातील वैर बाजूला ठेवा…. किती सोपा आहे न असा म्हणणं?

IPL वाल्यांनी कोणत्या का कारणांनी पाकिस्तानी खेळाडूंना घेतला नाही तो त्यांचा प्रश्न आहे. शेवटी ते लोक धंदा करायला बसलेत. मी म्हणेन त्या खेळाडूं मार्फत चांगली अद्दल घडली आहे पाकिस्तानला. आपण हर तर्ह्रेने त्यांचा त्रास सहन करायचा आणि आपण आपसी भाईचाऱ्या अंतर्गत त्यांच्या खेळाडूंना, गायकांना डोक्यावर बसवून ठेवायचं. त्या लोकांकडे आपल्या सारखी चित्रसृष्टी  नाही म्हणून आपले चित्रपट तिकडे चवीने पहिले जातात. वाघाला वाघ म्हणा अथवा वाघोबा म्हणा त्याला काही फरक पडणारे का?

मी तर तो कोण तो आतिफ अस्लम, अदनान सामी यांसारख्या पाकिस्तानी कलाकारांची साधी गाणी सुध्धा न गुणगुणायचा विचार करतोय…..

जरा जुन्या पोस्ट्स »

Follow

Get every new post delivered to your Inbox.